Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतून त्या महिला का झाल्या अपात्र? 7 महत्त्वाची कारणे आली समोर, पाचवं आणि सातवं कारण सर्वात महत्त्वाचं

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत घोटाळे समोर आल्याने ई-केवायसी बंधनकारक करण्यात आले. यामुळे धक्कादायकपणे ८० लाख महिला अपात्र ठरल्या आहेत, ज्यामुळे राज्यात वादंग निर्माण झाले आहे. सरकारचा हा मोठा निर्णय असून, अपात्रतेची नेमकी कारणे आता स्पष्ट झाली आहेत. याचा ८० लाख महिलांना मोठा फटका बसला असून विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतून त्या महिला का झाल्या अपात्र? 7 महत्त्वाची कारणे आली समोर, पाचवं आणि सातवं कारण सर्वात महत्त्वाचं
लाडकी बहीण योजनेतून लाखो महिला अपात्र
| Updated on: Jun 02, 2026 | 10:23 AM

राज्यातील ज्या महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत करण्यासाठी महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ जाहीर केली. साधारण 2 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांन दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. राज्यातील कोट्यवधी महिलांनी याचा लाभ घेतला आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला याचा प्रचंड फायदा झाला. मात्र या योजनेत अनेक गैरप्रकार झाले, अनेकांनी योजनेसाठी पात्र नसूनही फसवणूक करत योजनेसाठी अर्ज भरला आणि दरमहा 1500 रुपये लाटले. त्यानतंर गैरप्रकार होत असल्याचे दिसत असल्यावर पडताळणी करण्यात आली. तसेच योजनेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी इकेवायसी बंधनकारक करण्यात आली.

मात्र ईकेवयासीनंतर लाखो लाडक्या बहिणी या अपात्र ठरल्या असून त्यांचा आकडा तब्बल 80 लाखांच्या घरात गेल्याचे नुकतेच समोर आले होते. त्यामुळे या महिलांना या योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाहीये. सरकारने तसा मोठा निर्णय घेतला असून त्यामुळे राज्यातील 80 लाख लाडक्या बहिणींना मोठा फटका बसला आहे. यावरून राज्यात सध्या वातावरण तापलं असून विरोधकांनी तर सरकारवर चांगलंच तोंडसुख घेतलं आहे. रोहित पवार, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेकांनी सरकारवर टीका केली आहे.

लाडकी बहिण योजनेतून कोणत्या महिला अपात्र ? नेमकं कारण काय ?

दरम्यान लाडकी बहीण बाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. ज्या लाखो महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या, त्या महिला नेमक्या कोण, आणि त्या अपात्र का ठरल्या, त्याची नेमकी कारण काय आहेत ते आता समोर आलं आहे.

या योजनेचा काही पुरुषांनीही फायदा घेतला, म्हणून तेही अपता्र ठरले असून त्यांना मिळालेल्या रकमेची आता वसुली केली जाणार आहे.

कोण कोण ठरलं अपात्र ?

1) लाडकी बहीण योजनेसाठी ज्यांनी महिला म्हणून अर्ज केले असे 16 हजार पुरुष अपात्र

2) 74 हजार महिला : वय वर्ष 21 पेक्षा कमी ( या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा आखून देण्यात आली होती. 21 ते 65 वयोगटातील महिला अर्ज करू शकता. मात्र वय वर्ष 21 पेक्षा कमी असलेल्या 74 हजार महिलांनीही अर्ज केल्याने त्या अपात्र ठरल्या.)

3) 2 लाख महिला : वय 65 वर्षांपेक्षा अधिक – तसेच ज्यांचे वय 65 पेक्षा अधिक आहे, त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही . 65पेक्षा अधिक वय असलेल्या 2 लाख महिलांनी अर्ज केल्याने त्याही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र आहेत.

4) 10 लाख महिला : ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक आहे किंवा जे इन्कम टॅक्स रिटर्न भरतात. (गोरगरिब आणि वंचित कुटुंबातील महिलांना आर्थिक पाठबळ मिळावं यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. अडीच लाखांपेक्षाअधिक उत्पन्न असलेल्या या महिला योजनेच्या निकषांत बसत नाहीत. )

5) 4.5 लाख महिला : ज्यांनी घरातील एक सदस्य सरकारी नोकरीत आहे असे दाखवले. ( सरकारी नोकरीतील सदस्य असलेले कुटुंबही योजनेसाठी पात्र नाही.)

6) 2 लाख महिला : ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे, अशा महिलाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, अशा 2 लाख महिला अपात्र ठरल्या.

7) 62 लाख महिला: ज्यांनी 5 महिने संधी मिळून सुद्धा ई-केवायसी केली नाही. ई-केवायसीसाठी 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली होती, तरीही केवायसी केली नाही, अशा महिलांनाही या योजनेतून वगळण्यात आलं आहे.

 

 

Follow Us