AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शपथविधीला आता 48 तास शिल्लक, अजूनही गृहखात्यावरुन पेच कायम

महायुतीचा शपथविधी ५ तारखेला होणार आहे. त्यासाठी आझाद मैदानावर जोरदार तयारी सुरु आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार हे जवळपास निश्चित असताना गृहखात्यावरुन मात्र पेच कायम आहे. गृहखातं कोणाला मिळणार याबाबत अजूनही सस्पेंस कायम आहे.

शपथविधीला आता 48 तास शिल्लक, अजूनही गृहखात्यावरुन पेच कायम
shailesh musale
shailesh musale | Updated on: Dec 03, 2024 | 10:38 PM
Share

महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. देवेंद्र फडणवीस यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे. पण तरी देखील भाजप काही वेगळा निर्णय घेतो का याकडे ही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्रीपदाच्या सर्व शक्यताना पूर्णविराम देत भारतीय जनता पक्षाने अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. उद्या म्हणजेच ४ डिसेंबरला विधीमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत नवीन मुख्यमंत्र्यांची निवड केली जाणार आहे. भाजपमध्ये मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी निरीक्षकांची नेमणूक केली जाते.

मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला आता 48 तास शिल्लक आहेत आणि अजूनही गृहखात्यावरुन पेच कायम आहे. एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रिपदासह गृहमंत्रिपद मिळावं, असं गुलाबराव पाटील म्हणालेत.

गुलाबराव पाटलांच्या बोलण्यातून एक बाब स्पष्ट झाली की, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. पण गेल्या महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना गृहमंत्री फडणवीसच होते. तोच तर्क शिवसेना आता देतेय…आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होत असताना गृहखातं त्यांच्याकडे असावं हे उघडपणे शिंदेंचे नेते सांगत आहेत.

भाजप गृहखातं सोडण्यास तयार नाही…फडणवीसांकडेच गृहखातं राहील असं चित्र आहे…तर गृहखात्यावरुन निर्माण झालेला पेच आता गृहनिर्माण खात्यापर्यंत आलाय.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं गृहनिर्माण खातं मागितल्याचं कळतंय. महायुती सरकारमध्ये गृहनिर्माण खातं भाजपकडेच होते…आणि आता पुन्हा गृहनिर्माण खातं भाजप स्वत:कडेच ठेवणार आहे.

विशिष्ट खात्यांसह, नेमकी किती खाती मिळावी यावरुनही शिवसेना आणि राष्ट्रवादीत आता एकमेकांना स्ट्राईक रेट दाखवला जातोय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप स्वत:कडे 23-25 मंत्रिपदं ठेवू शकते. शिवसेनेला 9-10 आणि राष्ट्रवादीला 8-9 मंत्रिपदं मिळू शकतात.

मात्र विधानसभा निवडणुकीत आमचा स्ट्राईक रेट शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा जास्त आहे…त्यामुळं शिवसेनेएवढेच मंत्रीपदं मिळावेत, अशी मागणी भुजबळांनी केलीय. शिंदेंच्या शिवसेनेनं 81 जागा लढल्या…त्यापैकी 57 आमदार आलेत…70चा स्ट्राईक रेट आहे. राष्ट्रवादीनं 59 जागांपैकी 41 जागा जिंकल्यात…त्यांचा स्ट्राईकरेट आहे 69 %.. एका टक्क्यानं शिंदे स्ट्राईक रेटमध्ये पुढे आहेत.

तर शिंदे आणि अजित पवारांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं संजय राऊत म्हणालेत. स्वााभाविक आहे. आमदारांच्या संख्याबळानुसारच, मंत्रिपदाची संख्याही निश्चित होईल..त्यात भाजपच आघाडीवर असेल. तर दादांपेक्षा शिंदेंच्या पारड्यात 2-3 मंत्रिपदं अधिक असतील.

Follow Us