जमिनीवरचा पुतळा नीट बांधता येत नाही. हे समुद्रात बांधायला निघाले होते – राज ठाकरे

राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने सरकारवर टीका केली आहे. जमिनीवरचा पुतळा नीट बांधता येत नाही आणि हे समुद्रात बांधायला निघाले होते. अशी शब्दात त्यांनी टीका केली आहे. यावर पैसा खर्च करण्यापेक्षा गड किल्ल्यांवर खर्च करा असं आवाहन देखील राज ठाकरे यांनी केले आहे.

जमिनीवरचा पुतळा नीट बांधता येत नाही. हे समुद्रात बांधायला निघाले होते - राज ठाकरे
shailesh musale | Updated on: Sep 21, 2024 | 8:26 PM

व्हिजन वरळी या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी बदलापूरच्या घटनेवरुन चिंता व्यक्त केली. राज ठाकरे म्हणाले की, मूळ विषयाकडून तुम्हाला दुसरीकडे नेलं जात आहे. मग ते सत्ताधारी असो की विरोधक. बदलापूरला बलात्कार प्रकरण झालं. आपल्याच लोकांनी बाहेर काढलं. नाहीतर बाहेरच आलंच नसतं. नंतर सर्व टीका करायला लागेल. दरवर्षी या महाराष्ट्रात बलात्काराचं प्रमाण ३ ते ४ हजार आहे. एक काय घेऊन बसलाय तुम्ही. हा सरकारी आकडा सांगतोय मी. नागपूरच्या पीसीत हे आकडे वाचून दाखवलं. त्यावर इलाज कोणी शोधायला तयार नाही. यांच्या सरकारमध्ये झालं तर हे बोंब मारतात, त्यांच्या सरकारमध्ये झालं तर ते बोंब मारतात. हे कधी थांबणार यावर काहीच बोलत नाही. आरोपींना शिक्षा होत नाही. याचं कारण तुम्हाला भरकटवत नेत आहे.’

‘अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा. काँग्रेसचं सरकार असताना विषय आला होता. त्यावेळी मी एकमेव होतो, पुतळा बांधू नका असं म्हणणारा. गडकिल्ले दुरुस्त करा. ती खरी स्मारक आहेत. सिंधुदुर्गातील पुतळ्याचं काय झालं. हा तर जमिनीवरचा पुतळा आहे. तोही नीट बांधता येत नाही. हे समुद्रात बांधायला निघाले होते. कुणाच्या डोक्यातून येतं कळत नाही.’

‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा महाराजांचा पुतळा मोठा असेल असं कुणाच्या तरी वळवळला. त्याने स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिला नाही. शिल्पकला माहीत नाही. तेवढा पुतळा उभारायचा तर घोडा केवढा होईल. समुद्रात भराव टाकावा लागेल. त्यासाठी किमान २० ते २५ हजार कोटी खर्च येईल. त्यापैशात गडकिल्ले किती चांगले होतील सांगा. भविष्यातील पिढ्यांना पुतळे दाखवायचे की इतिहास दाखवायचा.’

शेवटी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘वरळीसाठी जे काही करता येईल ते १०० टक्के होईल. हे राज ठाकरे बोलतोय. जे माझ्याकडून शक्य होईल ते मी करेल. मला गृहित धरा.’

Follow Us