धक्कादायक: पुण्यात शिकत असलेल्या तरुणीचा जीबीएसमुळे मृत्यू, पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्रास सुरु
पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या एका तरुणीचा जीबीएस या विचित्र आजाराने बळी गेला आहे. त्यामुळे जीबीएस आजाराविषयी घबराट निर्माण झाली आहे. या आजाराचा वृद्ध आणि लहान मुलांना त्रास होतो असे म्हटले जात होते. परंतू आता तरुण मुलीचा बळी गेल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

जीबीएस या गुढ आजारामुळे राज्यात घबराट पसरली असताना आता या आजाराचे बळी वाढत चालले आहेत. या आजाराने पुण्यात शिकत असलेल्या एका विद्यार्थींनीचा बळी गेला आहे. या विद्यार्थीनी पुण्यात सिंहगड परिसरात शिकत होती. तिला पाणीपुरी खाल्यानंतर त्रास होऊ लागला होता. त्यानंतर तिची तब्येत खालावली तिच्यावर बारामतीत रुग्णालयात उपचार सुरु होते. काल तिचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
तीन आठवड्यापूर्वी पुण्यातील सिंहगड परिसरात शिकत असलेल्या बारामतीतील तरुणीला पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्रास सुरू झाला होता. ही तरुणी बारामतीत पोहोचल्यानंतर तिला जुलाब आणि अशक्तपणा जाणवू लागला होता. बारामतीतील रुग्णालयात उपचारासाठी गेल्यानंतर डॉक्टरांना तपासणी केली. त्यानंतर लगेच डॉक्टरांनी तिला पुण्याला उपचारासाठी घेऊन जाण्याचा सल्ला तिच्या नातेवाईकांना सल्ला दिला. गेली तीन आठवडे तिची सुरु असलेली झुंज अखेर संपली आहे.पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाही तिचा काल अचानक मृत्यू झाला. किरण राजेंद्र देशमुख असे या दुदर्वी युवतीचे नाव आहे.
अमरावतीत जीबीएसचा शिरकाव..
सध्या राज्यात सर्वत्र धुमाकूळ घालत असलेला जीबीएस या आजाराचा रुग्ण अमरावती जिल्ह्यात देखील आढळून आला आहे. 65 वर्षीय या रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल केले आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अष्टगाव येथील ही व्यक्ती १२ दिवसापूर्वी पुण्याहून प्रवास करून आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मात्र या पहिल्या जीबीएस रुग्णामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.




जळगावात तीन वर्षीय बालकाला ‘जीबीएस’
जळगावात तीन वर्षीय बालकाला ‘जीबीएस’ आजार झाल्याचे उघडकीस आले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभागातील अतिदक्षता वॉर्डात या बालकावर उपचार सुरू आहेत.या बालकाला गेल्याकाही दिवसांपासून पायदुखीचा त्रास झाल्याने रक्ताची तपासणी केली असता त्याला जीबीएस आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ‘जीबीएस’ या आजाराचे जिल्ह्यात आतापर्यंत तीन रुग्ण आढळून आले असून एका महिला रुग्णाला नुकताच डिस्चार्ज दिला आहे. तर एका तरुणासह बालकावर उपचार सुरू आहेत.