सर्व ठिकाणी मराठी भाषा हवी, सुभाष देसाईंच्या पत्रावर अमित शाह म्हणतात…

| Updated on: Feb 24, 2020 | 5:25 PM

गृहमंत्री अमित शाह यांनी केंद्राच्या विभागांमध्ये मराठी भाषेच्या वापरावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

सर्व ठिकाणी मराठी भाषा हवी, सुभाष देसाईंच्या पत्रावर अमित शाह म्हणतात...
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील केंद्र सरकारच्या अखत्यारितील विभागांमध्ये त्रि-भाषा सूत्रानुसार मराठी भाषेचा वापर करावा, या मागणीसाठी राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवलं. यावर गृहमंत्री अमित शाह यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे (Amit Shah on use of Marathi language ). याबाबत माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असं आश्वासन शाह यांनी पत्राद्वारे दिलं. त्यामुळे आता केंद्र शासनाच्या कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर कधीपासून सुरु होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणा आहे.

महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, 1964 नुसार मराठी ही राज्याची अधिकृत भाषा आहे. केंद्र शासनाने राजभाषा नियम 1967 चे धोरण अंगीकारले आहे. त्याद्वारे राज्याच्या अखत्यारितील केंद्र शासनाच्या सर्व कार्यालयांना त्रि-भाषा सूत्र लागू केलेलं आहे. परंतू राष्ट्रीयकृत बँका, पश्चिम आणि मध्य रेल्वे, टपाल आदी कार्यालयात या सूत्रांची अंमलबजावणी होत नसल्याची बाब सुभाष देसाई यांनी केंद्राच्या लक्षात आणून दिली आहे. याबाबत त्यांनी 6 फेब्रुवारीला अमित शाह यांनी पत्र पाठवून त्रि-भाषा सूत्राची अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती.

या पत्राला उत्तर देताना अमित शाह यांनी 20 फेब्रुवारीला माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळे आता केंद्राच्या अखत्यारितील प्राधिकरणांमध्ये त्रि-भाषा सूत्राची अंमलबजावणी होते की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीयकृत बँका, पश्चिम आणि मध्य रेल्वे यामध्ये मराठी भाषेचा वापर होत नसल्याच्या अनेक तक्रारी राज्य शासनाकडे दाखल झाल्या आहेत. केंद्राने यात लक्ष घालण्याचं आश्वासन दिल्याने केंद्रीय कार्यालयांत मराठीचा वापर होण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचं दिसत आहे.

Amit Shah on use of Marathi language