मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ सूचनेमुळे शिवसेनेच्या आमदारांना धडकी, काय घडलं बैठकीत?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' बंगल्यावर शिवसेनेच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे शिवसेना आमदारांमध्ये धडकी भरल्याची चिंता आहे.

मुख्यमंत्र्यांच्या त्या सूचनेमुळे शिवसेनेच्या आमदारांना धडकी, काय घडलं बैठकीत?
मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' सूचनेमुळे शिवसेनेच्या आमदारांना धडकी
| Updated on: Jul 18, 2024 | 5:14 PM

आगामी विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आज शिवसेना पक्षाची अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा करण्यात आली. जवळपास 4 तास ही बैठक चालली. या बैठकीत शिवसेनेचे सर्व आमदार, मंत्री आणि इतर महत्त्वाचे पदाधिकारी होते. या बैठकीत शिवसेना विधानसभा निवडणुकीत एकूण 110 जागांवर निवडणूक लढण्यासाठी तयारी करणार असल्याचं निश्चित झालं. पण या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी आमदारांना केलेल्या एका सूचनेमुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये धडकी भरल्याची चर्चा आहे.

एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक आमदाराला आपापल्या मतदारसंघात लक्ष देण्याचं आवाहन केलं आहे. तसेच महायुतीत बेबनाव होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना केलं. विशेष म्हणजे जागेची अदलाबदल झाल्यास मनाची तयारी ठेवावी लागेल, असं मोठं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या या सूचनेमुळे आमदारांना धडकी भरली आहे. कारण लोकसभा निवडणुकीत माजी खासदार भावना गवळी यांचं तिकीट कापलं गेलं. त्यामुळे शिवसेनेची एक जागा कमी झाली. तसेच नाशिकच्या जागेवरूनही प्रचंड नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या. नाशिकची जागा लवकर घोषित झाली असती तर माजी खासदार हेमंत गोडसे यांना तितक्या आक्रमकपणे प्रचार करता आला नसता.

याशिवाय आणखी काही ठिकाणी उमेदवारांची आदलाबदल करण्यात आल्याचं बघायला मिळालं. फक्त महायुतीच नाही तर महाविकास आघाडीतही तसा प्रकार बघायला मिळाला. ठाकरे गटाच्या कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेसने दावा केला. तर काँग्रेसच्या सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाने दावा केला. ठाकरे गटाचे नेते कोल्हापुरात काँग्रेसला विरोध करु शकले नाहीत. कारण तिथे छत्रपती घराण्याचे वंशज शाहू महाराज छत्रपती हे उमेदवार होते. पण सांगलीत हाय व्होल्टेज घडामोडी घडल्या. या घडामोडी पाहता उमेदवारांची आदलाबदल किंवा जागांचा आदलाबदल झाल्यास काही अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्याने आमदारांना धडकी भरल्याची चर्चा सुरु आहे.

एकनाथ शिंदे यांच्या सूचना काय?

110 विधानसभा निरीक्षक नेमले जाणार आहेत. त्याचबरोबर प्रभारी सुद्धा नेमले आहेत. सरकारी योजना सर्व मतदारसंघात प्रसारित करा. सदस्य नोंदणीवर भर द्या, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. शिवसेना युवासेना महिला आघाडी पद नेमणूक करा. प्रत्येकाने आपल्या मतदारसंघावर लक्ष द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या.

महायुतीतच लढायचं आहे, आपसात एकमेकांवर टीका करणं टाळा. सरकारी योजना लोकांपर्यत पोहोचवा. महिला, युवा कार्यकर्त्यांची सदस्य नोंदणी सूरू करा. या नोंदणीच्या कामाला गती द्या, अशा सूचना शिंदेंनी केल्या. आपल्या वाट्याला येणाऱ्या मतदारसंघात प्रबळ दावेकर कोण? त्यावर काम करणार. निवडून येणाऱ्यालाच तिकीट वाटपात आधी प्राधन्य देणार, असं एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं.

एकनाथ शिंदे दिल्लीश्वरांकडे जास्त जागा मागणार – सूत्र

विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांची विधानसभेच्या 110 जागांवर लढण्याची तयारी आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी 110 निरीक्षकही नेमले आहेत. शिवसेनेला विधानसभेत जास्तीत जास्त जागा मिळाव्यात याव्यात यासाठी एकनाथ शिंदे भाजपच्या दिल्लीश्वरांकडे मागणी करणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.