Rajya Sabha Election: तर राज्यसभा निवडणुकीत अपक्षांचं मत बाद होणार; चंद्रकांत पाटलांनी सांगितला नेमका नियम

| Updated on: Jun 02, 2022 | 4:09 PM

Rajya Sabha Election: संभाजी राजे यांनी आमच्याकडे कधीच उमेदवारी मागितली नाही. त्यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीला उमेदवारी मागितली होती, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Rajya Sabha Election: तर राज्यसभा निवडणुकीत अपक्षांचं मत बाद होणार; चंद्रकांत पाटलांनी सांगितला नेमका नियम
तर राज्यसभा निवडणुकीत अपक्षांचं मत बाद होणार; चंद्रकांत पाटलांनी सांगितला नेमका नियम
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीला (Rajya Sabha Election) अवघे आठ दिवस उरले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेने (shivsena) सहावा आणि भाजपने सातवा उमेदवार दिल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे सहावा उमदेवार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीकडे पुरेशी मते नाहीत. दोन्ही पक्षांची मदार अपक्षांवर आहे. भाजपला काही अपक्षांचा पाठिंबा दिला आहे. तरीही त्यांना दहा मते कमी पडतात. तर आघाडी सरकारसोबत असलेल्या अपक्षांचा आकडा पकडला तर ही आघाडीकडे पुरेशी मते होतात. मात्र, यात एक गोची आहे. ती म्हणजे अपक्षांना कोणताही व्हीप लागू होत नाही. शिवाय अपक्ष आमदार मतदान करण्यास कुणालाही बांधिल नाही. त्यामुळेच भाजपचा डोळा या अपक्ष आमदारांवर आहे. या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी एक मोठं विधान केलं आहे. पक्षांच्या आमदारांना पोलिंग एजंटला आपली मते दाखवावी लागतात. पण अपक्ष आमदारांना मते दाखवावी लागत नाहीत. त्यांनी मते दाखवली तर ते बाद होतात, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. त्यामुळे मतदानाच्या दिवशी अपक्ष आमदार डाव टाकणार की डाव साधणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीवर भाष्य केलं. राज्यसभेच्या निवडणुकीत फटका कोणाला बसेल ते कळेलच. आम्हाला फटका बसणार नाही हे नक्की आहे. राज्यसभा निवडणूकीत मत दाखवावं लागतं हे खरं आहे. पण व्हिप मोडला तर कसलीही कारवाई होत नाही. अपक्षांना कोणालाही मतं दाखवता येत नाही. दाखवलं तर ते मत बाद होतं, असं पाटील म्हणाले.

हे सुद्धा वाचा

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव निवडणूक प्रभारी

भाजपाचे तीन राज्यसभा सदस्य निवृत्त होत असल्याने पक्षाने तीन उमेदवार निवडणुकीस उभे केले आहेत. भाजपाच्या संख्याबळानुसार दोन उमेदवार सहज निवडून येतात व त्याखेरीज तिसऱ्या उमेदवारासाठी आमच्याकडे पहिल्या पसंतीची 32 जादा मते आहेत. त्यामुळे या जागेसाठी आमचाच दावा आहे. महाविकास आघाडीकडे किती जास्त मते आहेत, हे त्यांनी सांगावे. या निवडणुकीत मतदारांनी पक्षाच्या प्रतिनिधीला मत दाखवायचे असले तरी व्हिप पाळला नाही म्हणून आमदारकी रद्द करता येत नाही. अपक्षांनी तर त्यांचे मत कोणालाही दाखवायचे नाही. अशा स्थितीत आमदारांनी सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून मतदान करावे. महाविकास आघाडीनेही वस्तुस्थिती मान्य करावी आणि अनावश्यक तणाव दूर करावा, असे आमचे आवाहन पाटील यांनी केलं. भाजपाचे महाराष्ट्रासाठीचे राज्यसभा निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

संभाजी छत्रपतींनी उमेदवारी मागितली नाही

यावेळी त्यांनी संभाजी छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. संभाजी राजे यांनी आमच्याकडे कधीच उमेदवारी मागितली नाही. त्यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीला उमेदवारी मागितली होती, असं त्यांनी स्पष्ट केलं.

भाजपचाच उमेदवार निवडून येणार

दरम्यान, अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनीही भाजपचाच उमेदवार राज्यसभेत निवडून येणार असल्याचं स्पष्ट केलं. भाजपचा उमेदवार राज्यसभेच्या निवडणुकीत मोठ्या फरकाने निवडून येईल. काही अपक्ष आमदार शरीराने जरी मुख्यमंत्र्यांसोबत असेल किंवा मातोश्रीवर जात असेल पण ते अपक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आहेत, असा दावा रवी राणा यांनी केला. काही लोक घोडेबाजार करत असतील. पण मते भाजपला मिळणार आहे हेच मला घोडेबाजार करणाऱ्यांना सांगायचं आहे, असंही ते म्हणाले.