खासदारकीचं तिकीट कापल्यानंतर भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांचं पहिल्यांदाच स्पष्टीकरण, म्हणाले…

| Updated on: Mar 24, 2024 | 8:09 PM

"घरामध्ये पती-पत्नी नाराज असतात. पण जसा संचार चालतो तशाचप्रकारे पक्षाचं कामही चालतं. मी नाराज नाही. पण आता पहिल्यापेक्षा रिलॅक्स मूडमध्ये आहे. जो बोजा होता तो आता हलका झालेला आहे", अशी प्रतिक्रिया गोपाळ शेट्टी यांनी दिली.

खासदारकीचं तिकीट कापल्यानंतर भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांचं पहिल्यांदाच स्पष्टीकरण, म्हणाले...
Follow us on

उत्तर मुंबईतील भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांचे तिकीट रद्द झाल्यानंतर गोपाल शेट्टी यांनी आज पहिल्यांदाच ‘टीव्ही 9 मराठी’सोबत मनमोकळेपणाने चर्चा केली. मी पक्षावर नाराज नाही, असं गोपाळ शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच आपण पक्षासाठी काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. “तिकीट अनेक लोकांना मिळतं. अनेक लोकांना मिळत नाही. ज्यांची अपेक्षा नसते अशा लोकांना तिकीट मिळतं. पक्षाने तिकीट नाही दिलं तर त्यामागे काही कारण असेल”, असं गोपाळ शेट्टी म्हणाले. मी इतकी कामे केली आहेत. त्यामुळे पक्षाने तिकीट दिलं नाही म्हणून कार्यकर्त्यांची आणि मतदारांची नाराजी असणं हे स्वभाविक आहे. पण आधी पेक्षा जास्त आणि चांगल्या मतांनी आमचे मतदार पियूष गोयल यांना निवडून आणण्याचा माझा प्रयत्न आहे. दोनदा महाराष्ट्रात मी एक नंबरचे स्थान प्राप्त केलं. तिसरांदा हॅट्रिक सर्वजण मिळून करतील, असं गोपाळ शेट्टी म्हणाले.

“मी जे करू शकलो नाही ते पियूष गोयल करतील. कारण ते केंद्रात मंत्री आहे. मी आमदार प्रवीण दरेकर यांचं उदाहरण देतो. जेव्हा प्रवीण दरेकर आमदार म्हणून जितकं मागाठाणे मतदारसंघातील लोकांना भेटत होते आणि आता दरेकर यांना महाराष्ट्राची जबाबदारी दिली गेली तर ते महाराष्ट्रभर फिरत असतात. तर ते लोकांना कमी भेटतात. पियूष गोयल मंत्री आहेत. केंद्राचे मंत्री आहेत. संपूर्ण देश बघायचं आहे. हे लोकांना समजून घ्यायला पाहिजे. उत्तर मुंबईमध्ये इतके नगरसेवक आहेत, सक्षम आमदार आहेत आणि मी सुद्धा इथेच राहणार आहे. आता पहिल्यापेक्षा अधिक सुविधा लोकांना मिळणार आहेत”, असा विश्वास गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केला.

गोपाळ शेट्टी यांचं विनोद घोसाळकर यांना प्रत्युत्तर

यावेळी गोपाळ शेट्टी यांनी ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांच्या दाव्यालाही प्रत्युत्तर दिलं. “ते म्हणतात जिंकणार आणि आम्ही म्हणतो आम्ही जिंकू. आता निवडणुकीत कळेल ना काय होईल. पक्षाच्या नेत्यांसोबत आमची कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. मला ओळखणाऱ्या मतदारांना माहीत आहे की, गोपाल शेट्टी काय आहे”, असं गोपाळ शेट्टी म्हणाले.

‘मी कुठल्याही पक्षात जाणार नाही’

“सर्व पक्षाच्या नेत्यांची सहानुभूती माझ्यावर कालही होती आणि आजही आहे. तसेच उद्याही राहणार आहे. कारण माझं काम सर्वांनी पाहिलं आहे. मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. मी इथेच राहणार आहे”, असं गोपाळ शेट्टी यांनी स्पष्ट केलं. “मी मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांना जाऊन भेटलो आणि मी त्यांना सांगितलं मी पक्षाबरोबर आहे. काही काळजी करण्याचं कारण नाही. मी कामाला लागलो आहे. मुंबईतील शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. जोपर्यंत मतदान आहे तोपर्यंत आमचं काम असंच सुरू राहणार आहे. भविष्याचं आपण नंतर विचार करू”, असं गोपाळ शेट्टी म्हणाले.