शेतकऱ्यांना अल्प मदत, ठाकरे सरकारच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते 1 नोव्हेंबर रोजी काळ्या फिती लावणार

| Updated on: Oct 30, 2021 | 5:04 PM

अतिवृष्टी, पूर आणि वादळामुळे नुकसान सोसावं लागणाऱ्या शेतकऱ्यांना ठाकरे सरकारने अल्प मदत केली आहे. त्याच्या निषेधार्थ येत्या 1 नोव्हेंबर रोजी भाजपचे एक लाख कार्यकर्ते काळ्या फिती लावून अभिनव आंदोलन करणार आहेत. (bjp will agitation for rain-hit farmers in maharashtra)

शेतकऱ्यांना अल्प मदत, ठाकरे सरकारच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते 1 नोव्हेंबर रोजी काळ्या फिती लावणार
नानाजींनी सोनिया गांधींनाच खोटे पाडले, भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका
Follow us on

मुंबई: अतिवृष्टी, पूर आणि वादळामुळे नुकसान सोसावं लागणाऱ्या शेतकऱ्यांना ठाकरे सरकारने अल्प मदत केली आहे. त्याच्या निषेधार्थ येत्या 1 नोव्हेंबर रोजी भाजपचे एक लाख कार्यकर्ते काळ्या फिती लावून अभिनव आंदोलन करणार आहेत. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनाची घोषणा केली.

राज्यात गेल्या दोन वर्षांपासून वादळे, अतिवृष्टी, नापिकीमुळे भरडल्या गेलेल्या शेतकऱ्याच्या हातात सरकारी मदतीचा एक पैसादेखील पडलेला नाही. या सरकारने राज्यातील शेतकऱ्याची फसवणूक केली आहे. शेतकऱ्याच्या या संतापात सहभागी होऊन त्यांच्या व्यथांना वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन असेल, अशी माहिती केशव उपाध्ये यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांचं बोलघेवडे आश्वासन

ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर काही महिन्यांतच राज्यात निसर्ग वादळामुळे वाताहत झाली. हजारो शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त झाली आणि पुढील किमान दहा वर्षे पुन्हा उभे राहता येणार नाही अशी अपरिमित हानी झाली. या शेतकऱ्यांकरिता ठाकरे सरकारने मदतीची जोरदार घोषणाबाजीही केली. पण त्या मदतीचा पैसा वर्षानंतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नव्हता, हे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातच स्पष्ट झाले. मदत का मिळाली नाही याची माहिती घेतो, असे बोलघेवडे आश्वासन देऊन मुख्यमंत्री ठाकरे मुंबईत परतले, पण मंत्रालयाकडे मात्र फिरकलेच नाहीत. त्यामुळे मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यास न्याय मिळालाच नाही, असा दावा त्यांनी केला.

पैसा कुणाकडे पोहोचला?

सेलिब्रिटींच्या बचावासाठी सरकारमधील मंत्र्यांची कारकिर्द पणाला लावून त्यांच्यासाठी कामे बाजूला ठेवून किल्ला लढविणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांचा आक्रोश दिसत नाही का?, असा सवालही त्यांनी केला. 13 ऑक्टोबरला ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींच्या मदतीचा गाजावाजा केला. अजूनही त्यापैकी एक पैसाही शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेला नाही. केवळ संकटग्रस्त भागांचे दौरे करणे आणि मदतीच्या घोषणा करणे यात काही अर्थ नाही असे खुद्द मुख्यमंत्रीच म्हणाले होते. त्यांना आपल्या या वाक्याची आठवण असेल व थोडीशी जरी लाज असेल, तर त्यांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या मदतीमधून किती शेतकऱ्यांना लाभ झाला, कोणाकडे पैसा पोहोचला, याचा संपूर्ण राज्याचा तपशील जनतेसमोर उघड करावा, असे आव्हान त्यांनी दिले.

त्या घोषणांचे काय झाले?

महाराष्ट्रात गेल्या अनेक महिन्यांपासून महिलांवर बलात्कार, अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. महिलांना न्याय देण्यासाठी सरकारने वेळोवेळी केलेल्या घोषणांचे काय झाले? कोणत्या उपाययोजना अमलात आल्या आणि किती गुन्हेगारांना कोणत्या शिक्षा झाल्या? हेदेखील जाहीर करण्याची हिंमत ठाकरे सरकारने दाखवावी, असे ते म्हणाले.

सरकारला जाब विचारणार

गेल्या दोन वर्षांत खंडणी वसुली आणि टक्केवारीपलीकडे जनहिताची कोणतीही योजना न आखणाऱ्या निष्क्रिय सरकारच्या निषेधार्थ काळ्या फिती लावण्यात येईल. हे कार्यकर्ते जागोजागी सरकारला जाब विचारतील. काळ्या कारभाराचे वाभाडे काढून जनतेसमोर सरकारचे स्वार्थी रूप उघड करतील, असेही त्यांनी स्पष्ट केलं.

 

संबंधित बातम्या:

दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी 17 नंबरचा फॉर्म भरायचाय, वर्षा गायकवाड यांच्यांकडून वेळापत्रक जाहीर

तो मी नव्हेच! आणखी एका किरण गोसावीचा खुलासा; नवाब मलिक यांचा ‘तो’ दावा खोटा ठरणार?

औरंगाबादः 41 वर्षांचा वडिलांचा लढा मुलाने जिंकला, भरपाई 3 वरून 23 लाख रुपयांवर, जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर आली होती जप्ती

(bjp will agitation for rain-hit farmers in maharashtra)