सगळे अंदाज चुकले! मुंबईत ठाकरे बंधू एकत्र, पण फायदा कोणाला? आकडे काय सांगतात?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे सुरुवातीचे कल समोर आले असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) ५७ हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तब्बल २० वर्षांनंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंना संमिश्र यश मिळताना दिसत असून, मतदारांनी उद्धव ठाकरेंना कौल दिला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. सुरुवातीच्या कलानुसार मुंबईत पुन्हा एकदा ठाकरे नावाचा प्रभाव दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटाने ५७ जागांवर आघाडी घेत मोठी मुसंडी मारली आहे. तब्बल २० वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत युती केली. मराठी माणूस आणि मुंबई या मुद्द्यावर ही युती करण्यात आली होती. मात्र, आता महापालिकांच्या निकालाच्या आकडेवारीवरून असे दिसते की, मतदारांनी या युतीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर अधिक विश्वास दाखवला आहे, तर राज ठाकरे यांच्या मनसेला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही.
कोण किती जागांवर आघाडीवर?
या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी फुटाल तर संपाल असे भावनिक आवाहन केले होते. शिवसेनेतील फुटीनंतर आपले अस्तित्व सिद्ध करण्याचे उद्धव ठाकरेंकडे मोठे आव्हान स्वीकारले होते. ताज्या आकडेवारीनुसार, ठाकरे गटाने ६४ जागांवर आघाडी मिळवत मुंबई हा शिवसेनेचाच बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. सध्या महायुती (भाजप-शिंदे गट) हे ८० जागांवर आघाडीवर आहेत. सध्या मुंबईत भाजप मोठा पक्ष ठरला असाल तरी निकाल हा झपाट्याने बदलत आहे.
पक्षासमोर मोठे आव्हान
तर दुसरीकडे, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या निवडणुकीत मोठा धक्का बसताना दिसत आहे. युतीमध्ये मनसेने केवळ ५३ जागा लढवण्याचा निर्णय घेतला होता. ज्याचा थेट परिणाम त्यांच्या संख्याबळावर झाला आहे. सुरुवातीच्या कलानुसार मनसे केवळ ७ जागांवर आघाडीवर आहे. राज ठाकरेंनी मुंबईचा महापौर मराठीच असेल अशी गर्जना केली होती, तरीही मराठी मतदारांनी किंगमेकरच्या भूमिकेपेक्षा प्रबळ सत्ताधारी म्हणून उद्धव ठाकरेंना पसंती दिल्याचे चित्र आहे. यामुळे मनसेची ताकद वाढण्याऐवजी ती ठराविक वॉर्डांपुरतीच मर्यादित राहिली आहे. यामुळे आगामी काळात पक्षासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार
मुंबईत १५ जानेवारीला झालेल्या ५२.९४ टक्के मतदान झाले होते. मुंबईत प्रत्येक वॉर्डमधील निकाल उत्कंठा वाढवणारे आहेत. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मराठी मतांचे विभाजन टाळण्यात काही प्रमाणात यश आले आहे. मात्र तरी ही युती भविष्यात किती टिकणार, यावर आता चर्चा सुरू झाली आहे. महायुती आणि ठाकरे गट यांच्यातील फरक अत्यंत कमी असल्याने अपक्ष आणि लहान पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. तसेच मुंबईच्या महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याचे चित्र सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे.
