शरद पवार पुन्हा खासदार? पडद्यामागे मोठं प्लॅनिंग, उद्धव ठाकरेंसोबत…
Rajya Sabha Election : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणुकीची घोषणा झाली आहे. यातील एका जागेचे संख्याबळ महाविकास आघाडीकडे आहे. या जागेसाठी शरद पवार यांचे नाव चर्चेत आहे.

राज्यासह संपूर्ण देशात राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणुकीची घोषणा झाली आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीचे 6 उमेदवार राज्यसभेवर निवडून जातील. तर एक जागा महाविकास आघाडीला मिळणार आहे. सध्या या एका जागेवरून कोणाला दिल्लीला पाठवायचे याबाबत चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीचे नेते यासाठी एकमेकांची भेट घेताना पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवले जाण्याची शक्यता आहे. याबाबतच्या घडामोडींना वेग आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शरद पवारांना उमेदवारी?
शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यात यावे यासाठी राष्ट्रवादीकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी आज उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना जयंत पाटील यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज्यसभेच्या जागेच्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. मी आणि आमच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली आहे आणि आम्ही काँग्रेसशी देखील चर्चा करत आहोत. आम्ही शरद पवार यांना राज्यसभा निवडणूक तुम्ही लढावी असा आग्रह केला आहे.
लवकरच उमेदवार ठरणार
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार यांनी राज्यसभेवर जावं असा आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याचा निर्णय एक दोन दिवसात जाहीर करू. काँग्रेस पक्षांशी आमची चर्चा झालेली आहे. आज किंवा उद्या उमेदवारी निश्चित होईल. तसेच या भेटीनंतर बोलताना शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष संबंधित जागा आणि राजकीय समीकरणांवर चर्चा करण्यासाठी एकत्र येऊन निर्णय घेतला जाईल.’ त्यामुळे आता महाविकास अघाडीचा राज्यसभेचा उमेदवार कोण असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कोणत्या पक्षाचे किती आमदार?
महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 20 आमदार आहेत. त्याखालोखाल काँग्रेसचे 16 आमदार तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार आहेत. एका जागेसाठी महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ आहे. काही अपक्षांचाही महाविकास आघाडीला पाठिंबा आहे. त्यामुळे एक जाग ते सहज निवडून आणू शकतात. आता महाविकास अघाडीचा उमेदवारा कोण असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
