CJP Protest Delhi : दिल्लीतील आंदोलनानंतर अभिजीत दिपके यांची पहिली प्रतिक्रिया समोर, पोलिसांवर गंभीर आरोप
दिल्लीमध्ये आज कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन झालं, या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळालं, दरम्यान या आंदोलनावर आता अभिजीत दिपके यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने आज थेट संसदेवर मोर्चा काढण्यात आला. यादरम्यान पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी बॅडिकेड लावले, मात्र आंदोलकांनी हे बॅडिकेड ओलांडून संसदेच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून आश्रुधुराचा वापर करण्यात आला. तसेच लाठीचार्ज देखील करण्यात आला. दरम्यान त्यानंतर दिल्लीत काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळणं लागलं. दिल्लीच्या कॅनॉट प्लेस परिसरात आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली, या घटनेत पोलिसांच्या वाहनाच्या काचा फुटल्या.दरम्यान या आंदोलनावर आता कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी पोलिसांवर गभीर आरोप केले आहेत.
नेमकं काय म्हटलं अभिजित दिपके यांनी?
पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जवरून सीजेपी नेता अभिजीत दिपके यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिल्ली पोलीस पुरुष कर्मचाऱ्यांनी महिला आंदोकांवर देखील लाठीचार्ज केला असा आरोप अभिजीत दिपके यांनी केला आहे. तसेच पोलिसांनी गुडंगिरी केल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. सरकारने नीट परीक्षा देणाऱ्या 20 विद्यार्थ्यांचा जीव घेतला आहे, तरी देखील त्यांचं अजून समाधान झालेलं नाहीये, आता त्यांनी महिला आंदोलकांवर देखील लाठीचार्ज केला आहे, असा आरोप दिपके यांनी केला आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना अभिजीत दिपके यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी महिला आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप दिपके यांनी केला आहे. तसेच सीजेपीच्या वतीने ट्विटरवर एक पोस्ट देखील शेअर करण्यात आली आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं की आंदोलन सुरूच असून, अभिजीत दिपके, सौरव दास, आशुतोष रांका आणि सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांचं जंतर मंतरवर धरणे आंदोलन सुरूच आहे.
काय आहेत सीजेपीच्या मागण्या?
दरम्यान आज सीजेपीकडून सरकारकडे तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये सोनम वांगचूक यांच्या आंदोलनात अडथळा न आणता त्यांची सुटका, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि ज्या विद्यार्थ्यांनी नीट प्रकरणात आत्महत्या केली, त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत अशी मागणी करण्यात आली आहे.
