जरांगे विरुद्ध मुंडे संघर्ष पेटला! धनंजयला कसं मंत्री करतात ते बघतोच, जरांगेंचा इशारा
Manoj Jarange vs Dhananjay Munde : संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. याला आता जरांगे पाटलांनी विरोध केला आहे.

गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले आहेत. अशातच आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सध्याच्या काही मंत्र्यांना वगळून त्यांच्या जागी दुसऱ्या नेत्यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. मात्र याला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विरोध केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
धनंजय मुंडेला कसं मंत्री करतात ते आम्ही पाहतो
मनोज जरांगे यांना धनंजय मुंडे यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना जरांगे पाटील यांनी म्हटले की, तुझं नाव घ्यायला तू कोण लागून गेला? तुझ्या नास्तिकपणामुळे मराठा वंजारी समाजात वैर निर्माण झालं आहे. तू म्हणशील तसं म्हणायला बापाची पेंड लागली का? अजित पवारांनी लाथ मारून बाहेर काढलं, याला मंत्री पदावर घ्या, मग मराठे अंगावर येतील. राष्ट्रवादी, भाजप याला मंत्रिपदी कसं घेतात ते आम्ही बघतो. तुझ्यावाचून गुंतल काय? मराठा वंजारी प्रेम तुझ्यामुळे गेलं. धनंजय मुंडे हा उपद्रवी आहे, याच नाव कोण घेतं? अजित पवारांचा पक्ष गुंडांना सांभाळतो काय? धनंजय मुंडे ही घाण आहे. याच्यामुळे मराठे, वंजारी समाजावर प्रेम करत नाहीयेत.
पंकजा मुंडेंनी पक्षात सगेसोयरे आणू नये
पंकजा मुंडे यांच्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, ‘माझ्याकडे जालन्यातील भाजप आमदारंनी तक्रार केली आहे की, आम्हाला पालकमंत्री निधी देत नाही. पालकमंत्री त्यांच्या नातेवाईकांना निधी देतात, पंकजा मुंडे जालन्यात परळी पॅटर्न चालवतात काय? पालकमंत्री सग्या सोयऱ्यांना निधी देतात काय? पंकजा मुंडे अहंकारी आहेत पण खुणशी नाहीत. पंकजा मुंडे यांनी पक्षात सगे सोयरे आणू नये.’
दिल्लीतील आंदोलनावर बोलताना जरांगे पाटलांनी सांगितले की, ‘आंदोलन लोकशाही मार्गाने चालले आहे. धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवले पाहिजे. आंदोलन दडपण्याचं काम सरकार पहिल्यापासून करत आहे. आंदोलनाला आमची साथ आहे. सोनम वांगचूक यांना सर्वांनी साथ दिली पाहिजे, सरकारकडून वांगचूक यांना बेदखल करता कामा नये. सरकार विचारांना बेदखल करू शकत नाही.’
