
मुंबई महानगरपालिकेत आज ११ फेब्रुवारी रोजी महापौरपदाची औपचारिक घोषणा केली जाणरा आहे. तब्बल ४४ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भाजपचा दुसरा महापौर मुंबईच्या महापौरपदी विराजमान होत आहे. भाजपच्या रितू तावडे यांची महापौरपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. तर शिवसेना शिंदे गट गटाचे संजय घाडी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. विरोधी पक्षाकडून कोणताही अर्ज दाखल न झाल्याने त्यांच्या महापौरपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे मुंबई महापालिकेवरील प्रशासकीय राजवट अखेर संपुष्टात येणार आहे.
मुंबईच्या महापौरमधून निवड निश्चित झाल्यानंतर रितू तावडे आज पदभार स्वीकारणार आहेत. याबद्दल त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी पहिले काम काय करणार याचीही सविस्तर माहिती दिली आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवा भाऊ यांनी बहिणींसाठी दिलेला शब्द पाळला आहे. खऱ्या अर्थाने त्यांनी आज लाडक्या बहिणींना हा बहुमान दिला आहे. त्यामुळे देवाभाऊंचे आभार मानावे तेवढे कमी आहे. मुंबईच्या अध्यक्षा अमित साटम त्यांनीही माझे नाव सुचवले होते. त्यामुळे भाजपची पंरपरा आहे की काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पुढे आणलं जातं. घराणेशाहीला नाही, हे या निवडीतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, असे रितू तावडे म्हणाल्या.
मी महापौर म्हणून नाही तर सेवक म्हणून काम करणार आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगते की जरी मी महापौर झाली तरी मुंबईची सेवक म्हणून काम करणार आहे. पदभार स्वीकारल्यानंतर मुंबईतील बेकायदेशीर बांगलादेशी फेरीवाल्यांवर कडक कारवाई करण्याला माझे प्राधान्य असेल, अशीही माहिती रितू तावडे यांना दिली.
संजय राऊतांकडे टीका करण्यापलीकडे काहीही राहिलेले नाही. सकाळी ९ चा भोंगा असो नाहीतर इतर कुठलाही भोंग्याची दखल आम्ही घेत नाही. जनतेने आम्हाला फार अपेक्षेने निवडून पाठवलं आहे. मुंबईचं काम करण्यासाठी आम्हाला इथे पाठवलं आहे. संजय राऊतांनी जर काही चांगल्या सूचना मुंबईसाठी दिल्या तर त्या नक्की स्वीकारणार. रस्ते, खड्डे, पाणी ज्या काही इतर मुलभूत गरजा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी काम करणार आहे, असे रितू तावडे यांनी म्हटले.