Breaking | केंद्राच्या कृषी कायद्यांविरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार

| Updated on: Jan 17, 2021 | 12:14 PM

आता महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. कारण येत्या आठवड्यात खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रस्त्यावर उतरणार आहेत.

Breaking | केंद्राच्या कृषी कायद्यांविरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार
शरद पवार, उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : केंद्र सरकार कृषी कायद्याविरुद्ध राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 52 दिवसांपासून शेतकऱ्याचं आंदोलन सुरु आहे. आंदोलक शेतकरी आणि सरकारमध्ये आतापर्यंत चर्चेच्या 9 फेऱ्या झाल्या आहेत. मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. कारण येत्या आठवड्यात खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रस्त्यावर उतरणार आहेत. तशी माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री आणि राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.(CM Uddhav Thackeray and Sharad Pawar will agitate against the central government’s agricultural laws)

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरुद्ध येत्या आठवड्यात स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार आहेत. केंद्राच्या तिनही कृषी कायद्याविरोधात देशातील सर्व विरोधीपक्ष एकत्र आहेत. तिनही कायद्यांना सर्वोच्च न्यायालयानं सध्या स्थगिती दिली आहे. लोकशाहीत सरकारला कायदे रद्द करण्याचा अधिकार आहे. आज ना उद्या केंद्र सरकारला हे कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील, असं नवाब मलिक यांनी म्हटलंय.

विरोधकांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेत कृषी कायद्याला विरोध दर्शवला होता. त्यानंतर राहुल गांधी यांनीही आक्रमक पवित्रा घेत केंद्र सरकारवर सातत्याने टीकास्त्र डागलं आहे. केंद्र सरकारला कृषी कायदे परत घ्यावेच लागतील, असा ठाम विश्वासही राहुल गांधी यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रात खुद्द मुख्यमंत्री आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार असल्यानं कृषी कायद्याविरोधातील आंदोलन अधिक आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारसोबतची 9 वी बैठकही निष्फळ

केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये 15 जानेवारी रोजी पार पडलेली 9 वी बैठकही निष्फळ ठरली आहे. बैठकीत कृषी कायद्यावर तोडगा निघाला नाही. शेतकऱ्यांनी तिन्ही कायदे रद्द झाल्याशिवाय आंदोलनामधून माघार नाही, अशी ठाम भूमिका घेतलेली आहे. तर दुसरीकडे सरकारही मागे हटण्यास तयार नसल्याचं दिसतंय. त्यामुळे हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. आता शेतकरी आणि केंद्र सरकारमधील पुढील बैठक 19 जानेवारीला दुपारी 12 वाजता होणार आहे.

कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही- मलिक

महाविकास आघाडीतील नेते आणि मलिकांच्या जावयाचं ड्रग्ज प्रकरणातील कनेक्शनवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कायद्यापेक्षा कुणीही मोठा नसल्याचं नवाब मलिक म्हणालेत. ज्यांनी बदनाम केलं, कायदा मोडला त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. त्यात पत्रकारही आले. आपण धमकी देत नाही पण कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही, असं मलिक म्हणाले.

संबंधित बातम्या :

Farmers Protest : सरकारसोबतची 9 वी बैठकही निष्फळ, पुढची बैठक कधी?

कृषी कायद्यावर तोडगा काढण्यासाठीच्या समितीतून भूपेंद्रसिंग मान बाहेर

कृषी कायद्यासाठीच्या समितीत चौघांपैकी दोघे कायद्याचे समर्थक; ‘हा’ मराठमोळा नेताही समितीत

CM Uddhav Thackeray and Sharad Pawar will agitate against the central government’s agricultural laws