पुन्हा येईन म्हणणारे आता म्हणतायत मी गेलोच नाही, फडणवीसांच्या दुखऱ्या नशीवर ठाकरेंचं बोट

| Updated on: Oct 15, 2021 | 8:50 PM

अजूनही मी मुख्यमंत्री आहे असंच मला वाटतंय असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात फडणवीसांच्या या विधानाची खिल्ली उडवली. (CM Uddhav Thackeray address Shivsena Dussehra rally at Mumbai )

पुन्हा येईन म्हणणारे आता म्हणतायत मी गेलोच नाही, फडणवीसांच्या दुखऱ्या नशीवर ठाकरेंचं बोट
CM Uddhav Thackeray
Follow us on

मुंबई: अजूनही मी मुख्यमंत्री आहे असंच मला वाटतंय असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात फडणवीसांच्या या विधानाची खिल्ली उडवली. मी मुख्यमंत्री आहे असं मला कधीच वाटू नये. कारण हल्ली काही लोकांना मुख्यमंत्री असल्यासारख वाटत आहे, असा चिमटा काढतानाच पुन्हा येईन म्हणणारे आता म्हणतायत मी गेलोच नाही, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर भाजप असणार असल्याचं सांगितलं जात होतं. उद्धव ठाकरे यांनीही भाषणाला सुरुवात करताच थेट भाजपवर हल्ला चढवला. अगदी पहिल्या वाक्यापासून उद्धव ठाकरेंनी भाजपची पिसे काढली.

तुमचे आशीर्वाद घेत अशताना माझ्या मनात नेहमी नम्र भावना असते. प्रत्येक जन्मी हेच आई-वडील, माझा कुटुंब-परिवाह हाच मिळायला पाहिजे. आणि महाराष्ट्रात जन्म व्हायला पाहिजे. आणि मला स्वत:ला मी मुख्यमंत्री आहे, असं कधीच वाटू नये. माझं तर सोडाच तर माझ्या तमाम जनतेला मी मुख्यमंत्री आहे असं कधीच वाटता कामा नये. मी घरातलाच आहे, मी तुमचा भाऊ आहे, असं वाटो, अशी इच्छवर चरणी प्रार्थना आहे. कारण काही जणांना असं वाटतं जे बोलत होते पुन्हा येईल ते बोलत आहेत मी गेलोच नाही. बस आहे तिकडेच. पण जे संस्कार आणि संस्कृती असते ती हीच असते. पदं आणि सत्ता काय आहेत? पदं येतील जातील. पण कधीही अहमपणा कधी डोक्यात येऊ देऊ नको. ज्यादिवशी डोक्यात हवा जाईल, त्यादिवशी तू संपलास, अशी माझ्या वडील आणि आजोबांची शिकवण आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आपला आवाज कुणी दाबू शकत नाही

आजचा हा क्षण आपल्या आयुष्यात अत्यंत मोलाचा आहे. सुवर्ण क्षण आहे. शिवसेनाप्रमुखांनी सुरू केलेली परंपरा आपण पुढे नेत आहोत याचा अभिमान आहे. शस्त्र पूजन झाल्यानंतर खऱ्या शस्त्रांची पूजा केली. ही शस्त्रं म्हणजे तुम्ही आहात. मला कल्पना आहे बऱ्याच दिवसांनी आपल्याला वाव मिळाला आहे. आवाज आपला कुणी दाबू शकत नाही. आवाज दाबणारा जन्माला येऊ शकत नाही. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना दसरा आणि विजया दशमींच्या शुभेच्छा देतो. मलाही बरं वाटलं. कारण मला बऱ्याच दिवसांनी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव आणि भगिनींनो आणि मातांनो अशी हाक देता आली, अशी सुरुवात त्यांनी भाषणाची केली.

विरोधकांचे पूर्वज परग्रहावरून आले काय?

मोहन भागवत म्हणतात हिंदू म्हणून आपण एक आहोत. आपले पूर्वज एक होते. मला त्यांना विचारायचंय आपले पूर्वज एक आहेत तर विरोधकांचे पूर्वज परग्रहाहून आले काय? लखीमपूरमधील शेतकरी परग्रहावरून आले का? आंदोलक शेतकरी कुठून आले? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भागवतांना केला. मात्र, माझ्या म्हणण्याचा अर्थ समजून घ्या. तुमच्यावर टीका करतोय असं समजू नका, असंही त्यांनी सांगितलं.

हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा

खोडायचे अनेकांनी प्रयत्न केले. पाडण्याचेही प्रयत्न केले. पण माझं आजही आव्हान आहे. पाडून दाखवा. पण त्यांना सरकार पाडता येत नाही म्हणून छापा की काटा सुरू आहे. छापाकाटा टाकायचा आणि काटा काढायचा अशी खेळी सुरू आहे. पण ही थेरं मी अधिक काळ चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. हर हर महादेव काय असतं हे दिल्लीच्या तख्ताला दाखवण्याची वेळ येऊ नये. पण आलीच तर दाखवावीच लागेल, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.

 

संबंधित बातम्या:

Dussehra 2021 Live Updates | आपला आवाज दाबणारा जन्माला येऊच शकत नाही : उद्धव ठाकरे

’31 डिसेंबरपर्यंत ठाकरे सरकार आणि 40 चोरांचे घोटाळे बाहेर आले असतील’, भ्रष्टाचाराच्या रावणाचं दहन करत किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप

रावणालाही वाटत असेल हा आपल्या तावडीत सापडावा; निलम गोऱ्हेंचा किरीट सोमय्यांना खोचक टोला

(CM Uddhav Thackeray address Shivsena Dussehra rally at Mumbai)