मुंबईचा वीज पुरवठा खंडित का झाला? तातडीने चौकशी करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

| Updated on: Oct 12, 2020 | 1:28 PM

उद्धव ठाकरेंनी वीज पुरवठा सुरु करण्याचा सर्वोत्परी प्रयत्न करा, अशी सूचना नितीन राऊत यांना दिली आहे.(CM Uddhav Thackeray talk with Energy minister Nitin Raut on Power cut)

मुंबईचा वीज पुरवठा खंडित का झाला? तातडीने चौकशी करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
Follow us on

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची तातडीने चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच याप्रकरणी ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली. मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. भविष्यात परत अशी घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगावी असेही त्यांनी सांगितले. (CM Uddhav Thackeray talk with Energy minister Nitin Raut on Power cut)

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि लगतच्या परिसरातील अनेक भागांतील वीजप्रवाह सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास अचानकपणे खंडित झाला. दादर, लालबाग, परळ, अंधेरी, वांद्रे यासह अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडी झाला. त्यामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागला. जवळपास अडीच तासानंतर मुंबईतील वीज पुरवठा सुरळीत सुरु झाला आहे.

मुंबईतील संपूर्ण वीज जाण्याच्या घटनेमागे कोणते तांत्रिक दोष आहेत, तसेच कोण जबाबदार आहेत त्याबाबत चौकशी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले

दरम्यान सकाळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणे करून अडचण होणार नाही याबाबत महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या होत्या.

या सर्व काळात वीज पुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे. तसेच तात्काळ मदत करावी असेही त्यांनी मुख्य सचिव आणि मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितले.

उपनगरीय रेल्वेला याचा फटका बसला असून तिथेही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा असेही त्यांनी निर्देश दिले

मुंबईत बत्ती गुल

मुंबईत इतक्या मोठ्याप्रमाणावर वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तिन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी ट्रेनमध्ये अडकून पडले आहेत. ट्रेनमधील पंखे आणि लाईटही बंद झाले आहेत. याशिवाय, रस्त्यावरील सिग्नल आणि सीसीटीव्ही यंत्रणाही पूर्णपणे बंद पडली आहे.

तसेच यामुळे सर्व भागांतील रुग्णालये आणि कोरोना केंद्रातील वीजपुरवठाही खंडित झाला आहे. वीजपुरवठा लवकर पूर्ववत न झाल्यास व्हेटिंलेटवर व इतर अत्यावश्यक उपचारांसाठी लागणारी यंत्रणा ठप्प होण्याचा धोका आहे. त्यामुळे हा वीजपुरवठा कधी सुरळीत होणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणकोणत्या भागात वीज गायब?

  • दादर
  • लालबाग
  • परळ
  • प्रभादेवी
  • वडाळा
  • ठाणे
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • बोरिवली
  • मालाड
  • कांदिवली
  • पेण
  • पनवेल
  • उरण
  • कर्जत
  • खालापूर

कल्याण परिसरात जवळपास 60 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

कळवा पडघा जिआयएस (GIS) केंद्रातील तांत्रिक बिघाडामुळे कल्याण शहराला टाटा पॉवरकडून वीजपुरवठा होणारे केबी-1 आणि केबी-2 हे दोन फिडर सकाळी 10 वाजून 5 ते 7 मिनिटापासून बंद आहेत. केबी-2 फिडरवरून कल्याण पश्चिमेला वीजपुरवठा होतो. कल्याण पश्चिमेतील वायलेनगर, पारनाका, दुर्गाडी, गांधारी रोड, आधारवाडी परिसरातील जवळपास 50 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला आहे. तर केबी-1 फिडरवरून वीजपुरवठा होणाऱ्या कल्याण पूर्वेतील 90 फूट रोड, टाटा नेतीवली परिसरातील सुमारे 10 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला आहे. या फिडरवरील वीज ग्राहकांना पर्यायी फिडरमार्फत वीजपुरवठा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. आतापर्यंत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजेच 35 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आला आहे. वरील फिडर वगळता इतर सर्व ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत आहे.

(CM Uddhav Thackeray talk with Energy minister Nitin Raut on Power cut)

 

संबंधित बातम्या : 

Mumbai Power Cut LIVE : मुंबईतील बत्ती गुल, वीजेअभावी रुग्णालयातील शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या

Power grid failure | पॉवर ग्रीड फेल्युअर म्हणजे काय? भारतात किती पॉवर ग्रीड? वाचा सर्व काही