होळी, धूलिवंदनातून वाईट गोष्टींना हद्दपार करण्याची प्रेरणा, मुख्यमंत्र्यांकडून जनतेला सल्ला
मुख्यमंत्र्यांनी होळी आणि धुलिवंदन साजरा करण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (CM Uddhav Thackeray Wishes Holi festival)

मुंबई : देशभरात आज सर्वत्र होळी साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेला होळी आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करा. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी, निसर्गाविषयी आदर वाढवण्यासाठी असतो. या सणांकडून प्रेरणा घेऊन कोरोना विषाणूला रोखण्याच्या नियमांचे काटेकोर पालन करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले आहे. (CM Uddhav Thackeray Wishes Holi Rang Panchami festival)
राज्यात नाईट कर्फ्यू
राज्यात कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक ठिकाणी निर्बंध लावण्यात आले आहेत. आज (रविवार 28 मार्च) ते 15 एप्रिल 2021 पर्यंत राज्यात नाईट कर्फ्यू असणार आहे. हा कर्फ्यू रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत असेल. या वेळेत उद्याने, चौपाट्या अशा सार्वजनिक ठिकाणीही एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे, मास्क वापरणे, हात धुणे या त्रिसुत्रीचे पालन अत्यावश्यक आहे. गृह विभागानेही हे सण साधेपणाने साजरे करावेत, अशी सूचना दिली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचेही आदेश काढण्यात आले आहेत. या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन सण-उत्सव साजरे करावेत. होळी, धुलिंवदन सण यातून वाईट गोष्टींना हद्दपार करण्याची प्रेरणा घेऊया, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
आरोग्याची काळजी घ्या
निसर्गही रंगाची उधळण करतो. आपल्या आयुष्यातही रंग भरतो. रंग आनंद, सुख-समृद्धी घेऊन येतात. त्यामुळे रंगाचा सण साजरा करतानाही आपल्याला परस्परांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. गर्दी नकोच. एकत्र येणे टाळून कोरोनाचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखणे या देखील परस्परांसाठी शुभेच्छा आहेत. सदिच्छा आहेत, असे मानून सण साजरे करावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (CM Uddhav Thackeray Wishes Holi Rang Panchami festival)
धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा देखील अशाच पद्धतीने नियम पाळून व्हाव्यात, अशी अपेक्षाही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. या सोबतच मुख्यमंत्र्यांनी होळी आणि धुलिवंदन साजरा करण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
होळीसाठीचे नियम काय?
होळी, धुळवडीला सण सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे. पालिकेने दोनच दिवसांपूर्वी तसे आदेश जाहीर केले आहेत. निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागात पाच पथके तयार क ली आहेत. ही पथके फिरतीवर राहतील व तपासणी करतील. एखाद्या ठिकाणी नियमभंग होतो आहे असे आढळले तर समज दिली जाईल. मात्र त्यानंतरही लोकांनी ऐकले नाही तर पोलिसांची मदत घेतली जाईल व कारवाई केली जाईल. (CM Uddhav Thackeray Wishes Holi Rang Panchami festival)
संबंधित बातम्या :
सावधान! मुंबईकरांनो यंदा धुळवड खेळायला गेलात तर पोलिसांकडून कारवाई होणार
लॉकडाऊन नाही, पण, आजपासून राज्यभर जमावबंदी, रात्री 8 नंतर ‘या’ गोष्टींना ‘बंदी’; गाईडलाईन जारी
