‘मला अडकवण्यासाठी केसापासून नखापर्यंत…’, फडणवीसांचा मविआ सरकारवर मोठा आरोप

| Updated on: Apr 26, 2024 | 5:02 PM

"त्यांनी मला कुठल्यातरी केसमध्ये फसवण्याचा प्रयत्न खूप केला. केसापासून नखापर्यंत माझ्या चौकशा केल्या. पण त्यांना काहीच सापडलं नाही. खोट्या केसेस टाकण्याचा प्रयत्न केला. खोट्या केसेस टाकण्याकरता एक पोलीस आयुक्त आणून बसवला", असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

मला अडकवण्यासाठी केसापासून नखापर्यंत..., फडणवीसांचा मविआ सरकारवर मोठा आरोप
देवेंद्र फडणवीस
Follow us on

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि महायुतीचं सरकार स्थापन झालं. महाविकास आघाडीचं सरकार जवळपास अडीच वर्षे चाललं. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे सरकार कोसळलं. आता महायुतीचं सरकार स्थापन होऊन दोन वर्षांचा कार्यकाळ लोटला आहे. या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर सर्वात गंभीर आरोप केला आहे. महाविकास आघाडी सरकार असताना मला अडकवण्यासाठी केसापर्यंत नखापर्यंत चौकशा करण्यात आल्या, आसा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. देवेंद्र फडणवीस ईशान्य मुंबईचे भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. या रॅलीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मविआ सरकारवर गंभीर आरोप केला.

“त्यांनी मला कुठल्यातरी केसमध्ये फसवण्याचा प्रयत्न खूप केला. केसापासून नखापर्यंत माझ्या चौकशा केल्या. पण त्यांना काहीच सापडलं नाही. खोट्या केसेस टाकण्याचा प्रयत्न केला. खोट्या केसेस टाकण्याकरता एक पोलीस आयुक्त आणून बसवला. पण इतर पोलीस अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं नाही”, असा मोठा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

“शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे अहवाल काहीही देऊ शकतात. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष सुद्धा त्यांचा होईल, असाही अहवाल ते देऊ शकतात. पण वास्तविकता वेगळी आहे. आता आमच्यासोबत मनसेदेखील आलेली आहे. त्यामुळे आम्हाला आता काहीच अडचण वाटत नाही. पहिल्यांदा त्यांनी आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळावर एक श्वेतपत्रिका काढावी. या अडीच वर्षात महाराष्ट्राची किती हानी झाली याबद्दल माफी मागावी. त्यानंतर अशा प्रकारचा जाहीरनामा काढावा”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

‘ठाकरेंनी मुंबईला फसवण्याचं काम केलं’

“मुंबईला फसवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. त्यांच्याकडे 25 वर्षे होती. ते मुंबईतला एक प्रोजेक्ट दाखवू शकत नाहीत. आमच्याकडे सरकार आल्यानंतर, महापालिका आमच्या ताब्यात नसताना देखील आम्ही मुंबईचा कायापालट केला आणि करतोय. ते दावा करायला काहीही करु शकतात”, असं देवेंद्र फडणीस म्हणाले.

‘आमचे सहाही उमेदवार निवडून येतील’

“मुंबईच्या सहाही जागांवर भाजप-शिवसेना यांच्या महायुतीचे उमेदवार जिंकून येणार आहेत. मुंबईकरांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रचंड प्रेम आहे. मुंबईने मोदींना नेहमीच यश दिलेलं आहे. यावेळीसुद्धा मोदींना मुंबईतून प्रचंड यश मिळेल. आमचे सहाही उमेदवार निवडून येतील. मिहीर कोटेचा प्रचंड मतांनी विजयी होतील”, असा दावा फडणवीसांनी केला.