
मुंबई महानगरपालिका निवडणूका अगदी तोंडावर आल्या आहेत. राज्यात या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. 15 जानेवारी रोजी राज्यात महानगरपालिका निवडणुकीचे मतदान होणार आहे तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, आज महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रिपाईचे प्रमुख रामदास आठवले, मुंबई भाजपाध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये हा वचनमाना जाहिर करण्यात आला आहे. तो सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्लीज उद्धव ठाकरेंना माझा संदेश पोहोचवा असे म्हटले आहे. आता हा संदेश नेमका काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
“प्लीज उद्धव ठाकरेंना माझा संदेश पोहोचवा”
देवेंद्र फडणवीस यांनी वचननामा सादर करताना उद्धव ठाकरे यांना ओपन चॅलेंज दिले आहे. ते म्हणाले की, मी उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज दिलं आहे. उद्धव ठाकरेंच्या भाषणात विकासाचा मुद्दा दाखवा आणि पाच हजार घ्या. आमच्या भाषणात ९५ टक्के विकास असतो. ते विकास दाखवत नाही. हिंदुत्व आमचा मुद्दा आहे. आमचा हिंदुत्वावर अभिमान आहे. ते घेणारच. त्यांना सांगा लवकरच मला १ लाख पाठवा. प्लीज माझा संदेश त्यांना द्या. कारण माझ्या भाषणात विकासच असतो. त्यामुळे ते पैसे मी लाडक्या बहिणींना देईल.
लाडकी बहिण योजनेविषयी बोलताना काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाडकी बहिण योजनेविषयी बोलताना म्हणाले, काँग्रेस लाडक्या बहीण योजनेवर टीका करत आले आहे. ही ऑन गोईन स्कीम आहे. त्यामुळे कोणत्याही मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये स्पष्टपणे म्हटलं जात आहे की कोणतीच चालू योजना थांबवली जात नाही. त्यामुळे त्यांनी कितीही पत्र लिहिले तरी योजना थांबवता येत नाही. उलट लाडक्या बहिणींना पैसेच येईल.
रेल्वेचे तीन डबे वाढवणार
देवेंद्र फडणवीस म्हणाले, रेल्वेचे तीन डबे एक्स्ट्रा वाढवणार आहोत. एसीचे डबे करणार आहोत. सेकंड क्लासच्या तिकीटात वाढ करणार नाही. आम्ही टप्प्याटप्प्याने काम करणार आहोत. मुंबईत रो रो सुरू केली होती. ती यशस्वी सुरू आहे. काही ठिकाणी पॅसेंजर बोट सुरू केली आहे. आता एमएमआरच्या क्षेत्रात ८५ नॉटिकल माईल्स वॉटर ट्रान्सपोर्ट सुरू आहे. ती २००वर नेणार आहोत. २१ ठिकाणी जेट्टी तयार करणार आहोत. वॉटर टॅक्सी आणणार आहोत. स्वस्तात प्रवास करणार आहोत. नवी मुंबईतील एअरपोर्टपासून गेटवेपर्यंत वॉटर टॅक्साने येता येईल, असं प्लानिंग केलं आहे.