लॉकडाऊनमध्ये वाधवान कुटुंबाला पर्यटनासाठी मेहरबानी, प्रधान सचिवांना सक्तीची रजा, गृहमंत्र्यांची कारवाई

| Updated on: Apr 10, 2020 | 8:58 AM

प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या लेटरहेडवरुन वाधवान बंधूंना एक पत्र जारी करण्यात आले आहे. वाधवान बंधूंचा 'माझे कौटुंबिक मित्र' असा उल्लेख आहे (Wadhwan Family Gets pass by Principal Secretary to travel Mahabaleshwar during Lockdown)

लॉकडाऊनमध्ये वाधवान कुटुंबाला पर्यटनासाठी मेहरबानी, प्रधान सचिवांना सक्तीची रजा, गृहमंत्र्यांची कारवाई
Follow us on

मुंबई : लॉकडाऊनच्या कालावधीतही ‘डीएचएफएल’चे संस्थापक कपिल वाधवान आणि त्यांच्या कुटुंबाला खंडाळ्यातून महाबळेश्वरला जाण्यासाठी मदत करणे, प्रधान सचिवांना भोवले आहे. वाधवान कुटुंबातील 23 जणांना प्रवासाची सवलत देणारे पत्र जारी केल्याने प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. (Wadhwan Family Gets pass by Principal Secretary to travel Mahabaleshwar during Lockdown)

अमिताभ गुप्ता यांनी अधिकारांचा गैरवापर करत वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला जाण्यासाठी मदत केल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी गुरुवारी रात्री उशिरा चर्चा करुन गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला.

गृहमंत्र्यांनी याविषयी ट्विटरवर माहिती देताना कायदा सर्वांना समान असल्याचं नमूद केलं. अमिताभ गुप्ता यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवरच रहावे लागणार आहे.


काय आहे प्रकरण?

प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या लेटरहेडवरुन वाधवान बंधूंना एक पत्र जारी करण्यात आले आहे. वाधवान बंधूंचा ‘माझे कौटुंबिक मित्र’ असा उल्लेख करत अमिताभ गुप्ता यांनी वाधवान यांच्या पाच गाड्यांसाठी विशेष पास जारी केला होता.

या सर्वांना कौटुंबिक अत्यावश्यक कारणासाठी खंडाळा येथून महाबळेश्वरला जायचे आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. पाच गाड्यांचे नंबर आणि प्रत्येक गाडीतून प्रवास करणाऱ्या व्यक्तीची नावेही यावर आहेत. प्रत्यक्षात वाधवान कुटुंब आणि त्यांची मित्र मंडळी असे 23 जण फिरण्यासाठी महाबळेश्वरला गेल्याचं समोर आलं आहे.

‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी देश लॉकडाऊनमध्ये असताना वैद्यकीय उपचार किंवा जवळच्या व्यक्तीचे निधन अशा अपवादात्मक कारणासाठी प्रवासाला सूट दिली जाते. परंतु सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा वाजवत मौजमजेसाठी वाधवान कुटुंब महाबळेश्वरला गेल्याचं समोर आल्याने टीकेची झोड उठली आहे. कपिल वाधवान आणि त्यांच्या बंधूंना ताब्यात घेण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) पथक मुंबईहून रवाना झाले आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हे परवानगी पत्र ट्विटरवर शेअर केले आहे. (Wadhwan Family Gets pass by Principal Secretary to travel Mahabaleshwar during Lockdown)

वाधवान कुटुंब चौकशीच्या फेऱ्यात

‘दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड’चे (डीएचएफएल) संस्थापक वाधवान बंधूंचा अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्चीशी संबंध आणि ‘येस बँके’कडून घेतलेले कर्ज थकित झाल्याप्रकरणी ईडीकडून मनी लॉन्डरिंग कायद्या अंतर्गत तपास सुरु आहे. मिर्ची प्रकरणात त्यांना फेब्रुवारी महिन्यात जामीन मिळाला. तर येस बँक प्रकरणी तपास अद्याप सुरु आहे. पास सुरु असतानाच वाधवान बंधूंनी मुंबईबाहेर पळ काढल्याने आणि त्यातही संचारबंदीच्या काळात प्रवास केल्याबद्दल ईडीने त्यांना परत आणण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पॅरोलवर बाहेर असलेले कोट्यवधींच्या घोटाळ्याचे आरोपी ‘DHFL’ समुहाच्या वाधवान कुटुंबीयांना CBI च्या ताब्यात देण्याऐवजी राष्ट्रवादीकडे असलेल्या महाराष्ट्राच्या गृहखात्याने विशेष सवलत दिली. गृहमंत्र्यांना अंधारात ठेवून असे पत्र देणे हे अशक्य आहे. गृहमंत्र्यांची सखोल चौकशी करुन त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा अशी मागणी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तर विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारकडे स्पष्टीकरण मागितले आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख काय म्हणाले?