सर्वात मोठी बातमी ! मुंबईतील भाजपच्या कार्यालयाला भीषण आग; धुराचे प्रचंड लोट

| Updated on: Apr 21, 2024 | 4:56 PM

एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच मुंबईतील भाजपच्या कार्यालयाला मोठी आग लागली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सर्वात मोठी बातमी ! मुंबईतील भाजपच्या कार्यालयाला भीषण आग; धुराचे प्रचंड लोट
Fire in mumbai
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच मुंबईतून एक मोठी बातमी येत आहे. भाजपच्या मुंबईतील नरीमन पॉइंट येथील कार्यालयाला आग लागली आहे. आग लागल्यानंतर अवघ्या काही वेळातच आग भडकली. त्यामुळे धूर आणि आगीचे लोट पसरले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आग अटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे.

आज दुपारी 4.35 च्या सुमारास भाजपच्या कार्यालयाला आग लागली आहे. नरीमन पॉइंट येथील भाजपच्या या कार्यालयाचं नुतनीकरणाचं काम सुरू होतं. कार्यालयातील किचनमध्ये काम सुरू होतं. या ठिकाणी वेल्डिंगचं काम सुरू असताना अचानक शॉर्ट सर्किट झाला आणि त्यानंतर आग लागली. त्यानंतर ही आग अधिकच भडकत गेली. ऑफिसमध्ये कागदपत्रे आणि लाकडी फर्निचर असल्याने आगीने अधिकच पेट घेतला आणि त्यामुळे धुराचे लोटही पसरले. हे धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर पसरले. त्यामुळे या परिसरात काळोख पसरल्यासारखं वातावरण झालं.

अन् कर्मचारी बाहेर पडले

या कार्यालयात भाजपचं सोशल मीडियाचं काम चालतं. त्यामुळे निवडणुका असल्याने आजही सोशल मीडियाचं काम सुरू होतं. तेवढेच कर्मचारी ऑफिसमध्ये होते. आग लागल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी हातातील काम टाकून तात्काळ बाहेर धाव घेतली. सर्व कर्मचारी एका क्षणात ऑफिसच्या बाहेर पडले. त्यामुळे आगीत कोणीही अडकले नाही.

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी

अग्निशमन दलाला या आगीची माहिती देण्यात आली. त्यानंतर अवघ्या काही वेळात अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. कार्यालयात कोणीही अडकलेलं नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.

सुदैवाने बचावले

भाजपचं हे कार्यालय नेहमी नेते आणि कार्यकर्त्यांनी गजबजलेले असतं. मंत्री, आमदार, खासदारही याच कार्यालयात असतात. आमदार निवास आणि मंत्रालयाच्या परिसरातच हे कार्यालय असल्याने कार्यकर्त्यांनाही हे कार्यालय सोयीचं पडतं. त्यामुळे दिवसभर या कार्यालयात गर्दी असते. पण निवडणुका सुरू असल्याने सर्व नेते प्रचारात व्यस्त आहेत. आज रविवार असल्याने चाकरमानी घरी राहतात. त्यामुळे नेते सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रचारात व्यस्त असतात. आजही नेते प्रचारात व्यस्त होते. कार्यकर्तेही मतदारसंघात होते. त्यामुळे सोशल मीडियाचे कर्मचारी वगळता कुणीही कार्यालयात नव्हते. त्यामुळे अनर्थ टळल्याचं सांगण्यात येत आहे.