वन नेशन वन इलेक्शन घ्यायचं ना? मग आजच निवडणुका जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचं केंद्र सरकारला आव्हान

शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी आज शिवाजी पार्क दादर येथे सोनम वांगचुक आणि अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला समर्थन देणारे आंदोलन केले.उद्धव ठाकरे यांनी आता हे आंदोलन देशभरात पोहचवण्याची घोषणा केली आहे.

वन नेशन वन इलेक्शन घ्यायचं ना? मग आजच निवडणुका जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचं केंद्र सरकारला आव्हान
uddhav thackeray
| Updated on: Jul 19, 2026 | 5:48 PM

सोनम वांगचुक आणि अभिजीत दीपके यांनी जंतरमंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी सुरु केलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी साथ देत मुंबईतून आंदोलनाची सुरुवात केली. उद्धव ठाकरे यांनी या आपण आता मी दिल्लीला जाणार आहे. महाराष्ट्र आज इथे आहे. हे आंदोलन फक्त जंतरमंतर पुरतं मर्यादित ठेवायचं नाही. देशाच्या कानाकोपऱ्यात हे गेलं पाहिजे गली गली में शोर है ची घोषणा गावागावात गेली पाहिजे असे म्हणत देशभर आंदोलन करण्याची घोषणा आज दादर येथील शिवाजी पार्क येथे केली. मोदीजी तुम्हाला वन नेशन वन इलेक्शन घ्यायचं ना? मग आजच घ्या,आम्ही तयार आहोत असे आव्हानच उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला केले.

उद्धव ठाकरे यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी दादर येथे रविवारी आंदोलन केले आहे. या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले की  या ठिकाणी महिला आल्या आहेत. आपल्या घरात आपण साधी माणसं आहोत. घरात साधी महिला झुरळाला घाबरते असं मानलं जातं. इथे आपले पंतप्रधान झुरळाला घाबरतात.सरकार घाबरतं.जगातील मोठा पक्ष झुरळाला घाबरतो. भाड्याने माणसं घेतली. सत्ताधारी झुरळाला का घाबरतात हे आता कळलं. कारण हे भाडखाऊ आहेत.चोरून आणलेली माणसं आहेत. यांच्याकडे यांचं कुणी नाही म्हणून हे झुरळाला घाबरतात असाही टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.

मोदींना आव्हान आहे. वन नेशन वन इलेक्शन घ्यायचं ना. आता निवडणूक जाहीर करा. आम्ही तयार आहोत. नेशन म्हणजे काय असतं, राष्ट्र म्हणजे काय असतं हे दाखवून देण्याची वेळ या माजलेल्या सत्ताधाऱ्यांना दाखवून देण्याची वेळ आली आहे असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

या गोचिडांना सत्तेतून काढलं पाहिजे

या तरुणांना तुम्ही कॉकरोच म्हणता. तुम्ही सत्तेच्या गादीवर बसला. स्वातंत्र्य मिळालं नसतं तर तुम्हाला बुड टेकवायला गादी मिळाली नसती. स्वातंत्र्य सैनिक फासावर गेले. ते याच वयातले होते. ती काय झुरळं होती ? झुरळांमुळे तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं? तेव्हाच्या तरुण मुलांनी बलिदान केलं नसतं तर आज स्वातंत्र्य पाहायला मिळालं नसतं. ज्यांनी बलिदान केलं ते स्वातंत्र्य आपण टिकवणार की नाही. होय मीही झुरळ आहे. तरुणांना तुम्ही झुरळ म्हणत असाल तर त्यांचे आईवडीलही झुरळच आहे. मग हा देश काय झुरळांचा आहे. आम्हाला झुरळ म्हणणाऱ्यांना मी गोचिड म्हणतो. हे सत्तेला चिकटलेले गोचिड आहेत. या गोचिडांना सत्तेतून काढलं पाहिजे अशा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

 

Follow Us