अर्णव गोस्वामींच्या सुटकेनंतरच दिवाळी साजरी करू; राम कदम यांची सिद्धिविनायकापर्यंत पदयात्रा

| Updated on: Nov 08, 2020 | 11:39 AM

पत्रकार अर्णव गोस्वामी यांची सुटका व्हावी म्हणून उपोषण करणारे भाजपचे आमदार राम कदम आता अर्णव यांच्या सुटकेसाठी थेट सिद्धिविनायकाला साकडे घालणार आहेत.

अर्णव गोस्वामींच्या सुटकेनंतरच दिवाळी साजरी करू; राम कदम यांची सिद्धिविनायकापर्यंत पदयात्रा
Follow us on

मुंबई: पत्रकार अर्णव गोस्वामी यांची सुटका व्हावी म्हणून उपोषण करणारे भाजपचे आमदार राम कदम आता अर्णव यांच्या सुटकेसाठी थेट सिद्धिविनायकाला साकडे घालणार आहेत. राम कदम हे घाटकोपर येथील त्यांच्या निवासस्थानापासून ते प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरापर्यंत पदयात्रा करणार असून अर्णव यांच्या सुटकेनंतरच दिवाळी साजरी करणार असल्याचं कदम यांनी म्हटलं आहे.(ram kadam reaction on arnab goswami)

अर्णव गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक झाल्यानंतर त्यांची रवानगी थेट तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. अर्णव यांना अटक केल्यामुळे भाजपने तीव्र संताप व्यक्त केला असून भाजप नेते आणि कार्यकर्ते या अटकेच्या निषेधार्थ रोज आंदोलन करत आहेत. भाजपचे आमदार राम कदम हे सुद्धा अर्णव यांच्या सुटकेसाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन करून सरकारचा निषेध नोंदवत आहेत. दोन दिवसांपूर्वी राम कदम यांनी मंत्रालयासमोर उपोषण सुरू केलं होतं. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं.

मात्र, गेल्या तीन दिवसानंतरही अर्णव यांची सुटका न झाल्याने संतप्त झालेल्या कदम यांनी आता घाटकोपर ते सिद्धिविनायकापर्यंत पदयात्रा काढून अर्णव यांच्या सुटकेसाठी थेट सिद्धिविनायकाला साकडे घालण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्णव यांना करण्यात आलेली अटक चुकीची आहे. त्याचा आम्ही विरोध करत आहोत. या अटकेचा सर्वचस्तरातून विरोध होत आहे, असं सांगतनाच ज्या दिवशी अर्णव यांची सुटका होईल, त्याच दिवशी आम्ही दिवाळी साजरी करू, असं कदम यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र सरकारला ऐनकेनप्रकारे अर्णव यांना या प्रकरणात अडकवायचे आहे. त्यामुळेच त्यांची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली असून येत्या काळात ठाकरे सरकारला त्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा कदम यांनी दिला आहे.

अर्णव गोस्वामी यांची तळोजा कारागृहात रवानगी

दरम्यान, अलिबागच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये पोलीस सुरक्षेला गुंगारा देत एका व्यक्तीने अर्णव गोस्वामी यांच्यापर्यंत मोबाईल पोहोचवल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या मोबाईलवरुन अर्णव गोस्वामी यांनी एक फोन केल्याचेही समजते. सध्या पोलिसांकडून या सगळ्याची अंतर्गत चौकशी सुरु आहे. मात्र, भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी अर्णव गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलवण्यात आल्याचे सांगितले जाते. (ram kadam reaction on arnab goswami)

संबंधित बातम्या:

अर्णव गोस्वामी यांची तळोजा कारागृहात रवानगी; सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांचा निर्णय

पोलिसांना गुंगारा देत अर्णव गोस्वामींपर्यंत पोहोचवण्यात आला मोबाईल फोन?

(ram kadam reaction on arnab goswami)