
Sugar Price Hike: आखातातील युद्धामुळे साखर उद्योगावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. साखर कारखान्यांसह शेतकर्यांना युद्धाचा मोठा फटका बसला आहे. तर भाजीपाला स्वस्त झाला. बाजारात केळीचे भाव पण उतरण्याची शक्यता आहे. त्याचवेळी नवीन वर्षाला, गुढी पाडव्याला साखर गाठींचे भाव, साखर कडे महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इराण-इस्त्रायल युद्धामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद करण्याची वेळ मालकांवर आली आहे. तर दुसरकीडे घरगुती गॅस सिलेंडरसाठी अनेक शहरांमध्ये ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे समोर येत आहे. व्यवासायिक गॅस सिलेंडर बंद झाल्याने अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार होण्याची भीती व्यक्त होत आहे. युद्धाच्या झळा आता राज्यातील नागरिकांनाही जाणवत आहे.
साखर कारखानेही आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता
आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता साखर उद्योगावरही दिसू लागला आहे. युद्ध सुरू झाल्यापासून केंद्र सरकारने साखर कारखान्यांना दिलेला निर्यात कोटा जवळपास ठप्प झाला आहे. निर्यात थांबल्यामुळे स्थानिक बाजारात साखरेची आवक वाढली असून साखरेचे दर घसरले आहेत. काही दिवसांपूर्वी सुमारे ३७०० रुपये प्रति क्विंटलने विकली जाणारी साखर आता जवळपास ३२०० रुपयांवर आली आहे. दर घसरल्यामुळे याचा परिणाम थेट शेतकर्यांच्या ऊसाच्या हमीभावावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. युद्धामुळे निर्यात थांबणे, बाजारभाव घसरणे आणि वाढलेला साठा या तिहेरी संकटामुळे साखर कारखानेही आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी साखर उद्योगातून केली जात आहे.
गुढीपाडव्याला साखर गाठी महाग
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या सणाला साखर हारांना मोठे महत्व असते. या दिवशी साखर हार घालून गुढीची पूजा केली जाते. परंतु वाढत्या महागाईमुळे याच साखर हाराच्या किंमती गगनाला भिडल्याचे चित्र पंढरपूरमध्ये दिसत आहे. साखर आणि मजूरीच्या दरात मोठी वाढ झाल्याने यंदा साखर गाठी हाराच्या दरात सुमारे चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऐन गुडीपाडवा सणात सर्व सामान्यांना महागाईचा फटका बसला आहे गेल्या काही दिवसांपासून महागाईने उच्चांक गाठला असुन त्याचा फटका पंढरपुरातील साखर गाठी हार तयार करणाऱ्या व्यवसायिकांना ही बसला आहे. साखरे बरोबरच इतर कच्या मालाच्या दरात दुप्पट- तिप्पट वाढ झाली असल्याचे कारखानदार नागेश घोडके यांनी सांगितले.
नो ओटीपी नो गॅस सिलेंडर
नागपुरात ओटीपी शिवाय गॅस सिलिंडर नाही १० तारखेनंतर गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो. सिलेंडर बुक करा आणि ओटीपी वरंच सिलेंडर न्या, अशी नोटीस नागपूरातील गॅस गोडाऊनबाहेर लागली आहे. इराण युद्धामुळे १० तारखेनंतर गॅस सिलेंडरच्या मोठा तुटवडा होण्याची शक्यता आहे. गॅस गोडाऊनमधून घरगुती ग्राहक परत जात आहेत. गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्याने ओटीपी शिवाय सिलिंडर मिळत नाही. व्यावसायिक सिलेंडर गॅस गोडाऊन मध्ये नसल्याचे चित्र आहे.
केळी उत्पादकांना मोठा फटका
इराण-अमेरिका तणावाचा फटका नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकर्यांना बसला आहे. युद्धामुळे केळीच्या दरात मोठी घसरण गेल्या आठवड्याभरात २२०० वरून १२०० वर केळीचे दर आले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात केळी उत्पादक अडचणीत बाजारभाव घसरल्याने नुकसानाची भीती व्यक्त होत आहे. उत्पादन खर्च वाढला, पण दर घसरले केळी उत्पादकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. शासनाने मध्यस्थी करून केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
भाजपाला दर घसरले, शेतकरी हैराण
आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात भाजीपाल्याचे दर स्थानिक बाजारात घसरले आहेत, मुंबईतही भाजीपाला स्वस्त झाला आहे. निर्यातीत घट झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे… असंख्य कंटेनर अडकल्यामुळे १०० टन आवकीपैकी २० टन भाजीपाला स्थानिक बाजारात राहिल्याने शेतकर्यांना आर्थिक फटका बसत आहे. परदेशात निर्यात होणारा उच्च दर्जाचा भाजीपाला स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध झाल्यामुळे किंमती कमी झाल्याची माहिती मिळत आहे.
युद्धाच्या भीतीने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने तांदूळ आणि इतर शेतीमालाच्या निर्यातीवरही गंभीर परिणाम झाला आहे.