या माणसाने देशाचं वाटोळं… फोटो ट्विट करत आव्हाड यांचा अण्णा हजारे यांच्यावर निशाणा

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आव्हाड यांनी एक ट्विट करत अण्णा हजारे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच भुजबळांना पालकमंत्रीपद नाकारल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे.

या माणसाने देशाचं वाटोळं... फोटो ट्विट करत आव्हाड यांचा अण्णा हजारे यांच्यावर निशाणा
jitendra awhad
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 05, 2023 | 12:27 PM

मुंबई | 5 ऑक्टोबर 2023 : केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आल्यापासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एकही आंदोलन केलंल नाही. भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारे यांनी एकही शब्द काढलेला नाही. त्यामुळे अण्णांवर सातत्याने टीकाही होत असते. अण्णांच्या या मौनावर आश्चर्यही व्यक्त केलं जात आहे. राज्यात भाजपचं सरकार असल्यामुळेच अण्णा गप्प आहेत काय? असा सवालही केला जात आहे. विरोधकांकडून सातत्याने टीका होत असतानाच राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही अण्णा हजारे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून अण्णा हजारे यांच्यावर टीका केली आहे. ह्या माणसानी ह्या देशाचे वाटोळे केले. टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही, असा हल्लाच जितेंद्र आव्हाड यांनी चढवला आहे. आव्हाड यांनी अण्णा हजारे यांचा फोटो ट्विट करून हा हल्ला चढवला आहे. विशेष म्हणजे अण्णा हजारे यांच्यासंदर्भातील टीकेमागचं कोणतंही कारण आव्हाड यांनी दिलं नाही. अण्णा सध्या चर्चेतही नाही. असं असतानाही आव्हाड यांनी टीका केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

अण्णांवर नाराजी का?

अण्णा हजारे यांनी मनमोहन सिंग यांचं केंद्रात सरकार असताना मोठं जन आंदोलन उभारलं होतं. भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी हे आंदोलन पुकारलं होतं. अरविंद केजरीवाल, किरण बेदी, कुमार विश्वास आदी नेत्यांना घेऊन अण्णा हजारे यांनी जोरदार आंदोलन केलं होतं. त्यामुळे संपूर्ण देश ढवळून निघाला होता. अण्णांनी आधी उपोषण केलं. त्यानंतर त्यांनी देशभरात जनजागृती करून भ्रष्टाचारा विरोधात रान उठवलं होतं. मात्र, केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर अण्णांनी गेल्या 9 वर्षात एकही आंदोलन केलं नाही.

भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला नाही. अण्णा चर्चेतही राहिले नाही. यापूर्वी त्यांनी आधीच्या केंद्र सरकारकडे ज्या ज्या मागण्या केल्या होत्या, त्याचा पाठपुरावाही नव्या सरकारकडे केला नाही. त्यामुळे अण्णा हजारे हे भाजप धार्जिणे असल्याचा त्यांच्यावर आरोप केला जाऊ लागला. त्यांच्या या सूचक मौनावरून त्यांच्यावर जोरदार टीकाही केली जात आहे.

देशात मॉब लिंचिंग सारखे प्रकार घडत आहेत. अनेक ठिकाणी दंगली झाल्या. मणिपूर जळत आहे. असे असंख्य मुद्दे आहेत, त्यावर अण्णा हजारे यांनी सोयीस्कर मौन पाळलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी अण्णांवर टीका करणारं ट्विट केल्याची जोरदार चर्चा आहे.

फडणवीसांवर टीका

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवारांनी राष्ट्रपती राजवट लावली हे तुम्ही आता दोन वर्षांनी का सांगता? तुमच्यावर कोण विश्वास ठेवेल?, असा सवालच आव्हाड यांनी केला आहे. तसेच राष्ट्रवादीच्या फुटीवर उद्या निवडणूक आयोगाकडे सुनावणी होणार आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. उद्या केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होत आहे. पाहू काय होतंय, असं ते म्हणाले.

 

सर्व्हे आला आणि पद नाकारलं…

छगन भुजबळ यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं नाही. त्यावरून आव्हाड यांनी टोलेबाजी केली आहे. भुजबळ यांना पालकमंत्री पद का दिल नाही हे काय कळत नाही. भुजबळ हे ओबीसी समाजाचे मोठे नेते आहेत. एकीकडे बिहारचा सर्व्हे बाहेर आला आहे. देशात जातीय जनगणनेचा आवाज उठवला जात आहे. जेव्हा जेव्हा जातगणनेचा आवाज उठवला गेला तेव्हा तेव्हा भुजबळांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं आहे. माहिती नाही कुठल्या पार्श्वभूमीवर त्यांचं पालक मंत्रीपद कापलं गेलं. मला त्याची कल्पना नाही, असं आव्हाड म्हणाले.

आवाज गप्प करण्यासाठी…

ओबीसी चे प्रमुख नेते भुजबळ आहेत आणि त्यांनी ओबीसींसाठी खूप मोठी लढाई लढलेली आहे. हे नाकारता येणार नाही. ओबीसीचा सर्वात मोठा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितल जाते. त्यांनी भूमिका बदलली ठीक आहे. बिहारच्या जनगणनेनुसार भुजबळ हे नक्कीच खुश असणार. आपण जे म्हणतो ते सिद्ध होत आहे, असं सांगतानाच त्यांचा आवाज वाढू नये असं काही लोकांना वाटत असेल. कदाचित त्यांचा आवाज गप्प करण्यासाठी त्यांना पालकमंत्रीपद नाकारलं असेल. काहीच सांगता येत नाही. मी असं काही बोलू शकत नाही. जे काही आहे त्यात काय आता करणार, असंही ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us