डेलकरांच्या सुसाईड नोटमध्ये नावे असलेल्यांविरोधात गुन्हे दाखल करा; नाना पटोले यांची मागणी

| Updated on: Mar 02, 2021 | 8:16 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येवरून भाजपला इशारा दिलेला असतानाच आता काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी आज हा मुद्दा विधानसभेत लावून धरला. (maharashtra government should lodge complaints in mohan delkar suicide case says nana patole)

डेलकरांच्या सुसाईड नोटमध्ये नावे असलेल्यांविरोधात गुन्हे दाखल करा; नाना पटोले यांची मागणी
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
Follow us on

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येवरून भाजपला इशारा दिलेला असतानाच आता काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी आज हा मुद्दा विधानसभेत लावून धरला. डेलकर यांनी मुंबईत येऊन त्यांची जीवनयात्रा संपवली. त्यांच्याकडे सुसाईड नोट सापडली आहे. त्यात ज्या लोकांची नावे आहेत, त्या सर्वांविरोधात तात्काळ गुन्हे दाखल करा आणि दोषींवर कडक कारवाई करा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. (maharashtra government should lodge complaints in mohan delkar suicide case says nana patole)

राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना पटोले यांनी ही मागणी केली. आदिवासी समाजाचे डेलकर हे सातवेळा खासदार म्हणून निवडून आले. त्यांना प्रचंड मरण यातना देण्यात आल्या. आपल्याला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न केले पण शेवटी मुंबईत येऊन जीवनयात्रा संपवली. त्यांच्या १५ पानाच्या सुसाईड नोटमध्ये ज्यांची नावे आहेत त्यांच्यावर अजून गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी पटोले यांनी केली.

पंतप्रधानांकडेही डेलकरांनी व्यथा मांडल्या

डेलकर यांनी त्यांच्या व्यथा पंतप्रधान, गृहमंत्री आणि संसदेतही मांडल्या. त्यांना कशाप्रकारे त्रास दिला गेला हे त्यांच्या १५ पानी सुसाईड नोटमधील वर्णन वाचले तर अंगावर काटे येतील. या सुसाईड नोटमध्ये गुजरातचे माजी गृहमंत्री प्रफुल्ल खोडा पटेल यांचे नाव आहे. त्यांना भाजपाने दादरा नगर हवेलीचे प्रशासक म्हणून बसवले आहे. या प्रकरणात कोणी कितीही मोठे असले तरी ते कायद्यापेक्षा माठे नाहीत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

सीमा सील करण्याऐवजी थाळ्या वाजवल्या

यावेळी कोरोनाच्या मुद्द्यावरून पटोले यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. कोरोना काळात महाराष्ट्र सरकारने जनतेच्या जीवाचे रक्षण करण्याचे काम केले. पण या कामात विरोधक सरकारबरोबर आले नाहीत. उलट सरकारवर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. कोरोनाची चाहूल लागताच डिसेंबर 2019 मध्येच देशाच्या सीमा सील करण्याची गरज असताना केंद्रातील सरकारने ते काम केले नाही. दिवे लावा, थाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा असे प्रकार केले आणि अचानक लॉकडाऊन लावल्याने गरिब, कामगार, मजूर वर्गाचे झालेले प्रचंड हाल जगाने बघितले, असं ते म्हणाले.

पटोलेंनी सांगितला जीडीपीचा नवा अर्थ

खोटं बोल पण रेटून बोल, अशी विरोधी पक्षाची भूमिका राहिली असून जनता सध्या महागाईने होरपळत असतानाही विरोधी पक्षाने त्यावर बोलणे टाळले. उज्ज्वला गॅस दिले म्हणून गाजावाजा करणाऱ्या सरकारने गॅसचे दरच एवढे महाग केले की आता गॅस सिलींडर भरून घेणे सामान्य जनतेला परवडेनासे झाले आहे. मोदी सरकारने GDP मध्ये मोठी वाढ केली असे सांगताना पटोले यांनी G  म्हणजे Gas, D म्हणजे –Diesel आणि म्हणजे P- petrol … यात वाढ करुन सरकारने जनतेचे जगणे मुश्कील केले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

शेतकऱ्यांसाठी तरतूद करा

शेतकऱ्याचे धान सरकारने खरेदी करून त्याचे समर्थन मूल्य दिले पाहिजे. शेतकरी कर्जमाफी करताना नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन म्हणून देण्याची घोषणी केली होती ते पैसे अजून दिले गेले नाहीत. ते दिले नाहीत तर जे कर्ज थकवतात त्यांनाच कर्ज माफ होते असा चुकीचा संदेश जाईल म्हणून याच बजेटमध्ये ते ५० हजार रुपये देण्याची घोषणा करावी, अशी मागणी त्यांनी केली. (maharashtra government should lodge complaints in mohan delkar suicide case says nana patole)

 

संबंधित बातम्या:

पूजा चव्हाण प्रकरणात भाजप बड्या नेत्यांविरोधात अजून एक तक्रार

घोषणांचा पाऊस अन् अंमलबजावणीचा दुष्काळ… असं होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

मराठा आरक्षणावर 8 मार्चपूर्वीच श्वेतपत्रिका काढा; चंद्रकांत पाटलांची मागणी

(maharashtra government should lodge complaints in mohan delkar suicide case says nana patole)