ST कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा, मंत्रालयाच्या दारातच जनशक्ती संघटनेचं आत्मदहन आंदोलन, सरकार आवाज ऐकणार का?
Maharashtra ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा आजचा पाचवा दिवस आहे. पाच दिवस उलटून गेल्यानंतरही सरकारकडून ठोस आश्वासन मिळालं नाहीय. आज आक्रमक झालेल्या जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत मंत्रालयाच्या समोर आत्मदहन आंदोलन केलं.
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा आजचा पाचवा दिवस आहे. पाच दिवस उलटून गेल्यानंतरही सरकारकडून ठोस आश्वासन मिळालं नाहीय. आज आक्रमक झालेल्या जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत मंत्रालयाच्या समोर आत्मदहन आंदोलन केलं. एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाला जनशक्ती संघटनेने पाठिंबा दिला आहे. जनशक्तीच्या जवळपास 20 ते 30 कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोर आत्मदहन आंदोलन केलं. या आंदोलनात महिला कार्यकर्त्याही सामिल झाल्या होत्या. यावेळी कार्यकर्त्यांचा मोठा आक्रोश पाहायला मिळाला. हा आवाज शासन ऐकणार का?, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.
आज (रविवारी) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मंत्रालयाच्या मुख्य गेटवर जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. महामंडळाचं शासनामध्ये विलिनिकरण झालंच पाहिजे, एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणांनी मंत्रालय परिसर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला होता. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट पाहायला मिळाली.
आमच्या न्याय हक्कांसाठी आम्ही गेले अनेक दिवस आझाद मैदानावर बसलोय. सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही. आमचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाही. एस टी कर्मचाऱ्यांच्या आयुष्याची दैना झालीय. तुटपुंज्या पगारात कुटुंब कसं जगवायचं, याची भ्रांत पडलीय. पण सरकार आमचा आवाज ऐकायला तयार नाही, अशा भावना आंदोलनकर्त्यांनी एस टी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.
हे ही वाचा :