शिंदे गट म्हणजे भाजपने पाळलेलं कोंबड्यांचं खुराड, कधीही त्यांच्या मानेवर… संजय राऊत यांची खोचक टीका

आम्हालाही निमंत्रण आलं आहे. मी खासदार आहे. मोठ्या लोकांच्या घरचं लग्न असतं तर सर्व गावाला निमंत्रण दिलं जातं. पण मुद्दा हा आहे की राष्ट्रपतींना का बोलावलं नाही? हा मुद्दा आहे. उपराष्ट्रपती कुठे आहेत? आडवाणी कुठे आहे याचं उत्तर द्या, असंही ते म्हणाले.

शिंदे गट म्हणजे भाजपने पाळलेलं कोंबड्यांचं खुराड, कधीही त्यांच्या मानेवर... संजय राऊत यांची खोचक टीका
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 26, 2023 | 10:24 AM

मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. शिंदे गटाला मी पक्ष मानत नाही. हा कोंबड्यांचा खुराडा आहे. त्यामुळे ते फडफड करत आहेत. यांच्या मानेवरून कधीही सुरी फिरवली जाईल, असं सांगतानाच 22 काय शिंदे गटाला पाच जागाही मिळणार नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. ते मीडियाशी बोलत होते.

मी शिंदे गटाकडे पक्ष म्हणून पाहत नाही. भाजपने पाळलेलं ते कोंबड्याचं खुराडं आहे. गावात खुराडं असतं, तसं हे खुराडं आहे. या खुराड्यातील कोंबड्या कधीही कापल्या जातील. सकाळ, संध्याकाळ कोंबड्या आरवत असतता. तसे ते आहेत. कॉक कॉक कॉक करत आहेत. तसे करत आहेत. त्यांना काय पक्ष म्हणायचं का? पक्ष म्हणून काय आहे त्यांच्याकडे? त्यांना काही विचारधारा आहे काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

19 जागा कायम राहील

मिंधे टोळीने 22 काय 48 जागा लढवाव्यात आम्हाला काही फरक पडत नाही. मागच्या लोकसभेत आमचे 19 खासदार होते. महाराष्ट्रात 18 होते. आमचा 19 खासदारांचा आकडा कायम राहील. माझ्या वक्तव्यावर कोणी टीका केली तरी मला फरक पडत नाही. मी पक्षाची भूमिका मांडत आहे. 19 जागा कायम राहतील, असंही ते म्हणाले.

एका पक्षाचा कार्यक्रम आहे का?

यावेळी त्यांनी संसद भवनाच्या उद्घाटनावरूनही भाजपवर टीका केली. आम्ही केवळ विरोध करायचा म्हणून विरोध करत नाही. राष्ट्रपती आणि संविधानाच्या सन्मानाचा हा प्रश्न आहे. लोकसभेच्या अध्यक्षांनी पंतप्रधानांना बोलावलं आहे. या कार्यक्रम पत्रिकेत उपराष्ट्रपतीचं नाव नाही. राष्ट्रपतींनाही निमंत्रण नाही. प्रश्न इथे अडकला आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही निमंत्रण दिलेलं नाही. हा एका पक्षाचा कार्यक्रम आहे का? काय आहे हे? त्यावर उत्तर द्या. विरोधकांचा विरोध हा देशाच्या सन्मानासाठीचा आहे. नवीन संसद हा काही प्रायव्हेट कार्यक्रम नाही. तो देशाचा कार्यक्रम आहे, असं राऊत यांनी सांगितलं.

देशातील लोकशाहीवर बोला

आता इंदिरा गांधी यांनी विस्तारीत इमारतीचं उद्घाटन केलं होतं. संसद आणि विस्तारीत इमारत यात फरक आहे. राजीव गांधी यांनी लायब्ररीचं उद्घाटन केलं होतं. लायब्ररी आणि संसद यात फरक आहे. ऑस्ट्रेलियात जाऊन तिथल्या लोकशाहीचं गुणगाण गातात. पण या देशाची लोकशाही नेस्तनाबूत होत आहे, त्यावर तुम्ही बोला?, असं आव्हानच त्यांनी दिलं. या सर्वांमागचा उद्देश एकच आम्हीच आम्ही आम्ही. इतिहासात आमचंच नाव राहिलं पाहिजे. आम्हीच निर्णय घेणार, अशी टीकाही त्यांनी केली.

मायावतींनी खुशाल जावे

बसपा नेत्या मायावती यांनी कार्यक्रमाला पाठिंबा दिला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मायावतींना जायचं असेल तर त्यांनी जावं. त्यांना कोणी रोखलं आहे? मायावती विरोधी पक्षात आहे हे कोणी तुम्हाला सांगितलं? मायावती कुणाला पाठिंबा देते हे सर्वांना माहीत आहे.

आमचा मूळ प्रश्न आहे की देशाच्या राष्ट्रपतींना का बोलावलं नाही? राष्ट्रपतींचं नाव असलं पाहिजे. ओम बिर्लांचं नाव आहे. मग उपराष्ट्रपतींचं नाव कुठे आहे? भाजपचे प्रवक्ते काही खुलासे करतील पण मूळ प्रश्न आहे की नव्या संसदेला कोणीच विरोध करत नाही. उद्घाटन सोहळ्याला विरोध नाही. राष्ट्रपतींना दूर का ठेवलं हा प्रश्न आहे. उपराष्ट्रपती कुठे आहे? ज्या आडवानींनी संपूर्ण आयुष्य संसदेत काढलं ते कुठे आहेत?, असे सवालही त्यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us