
मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. जर तुम्ही गोरेगाव ते सीएसएमटी हार्बर मार्गावरुन प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पश्चिम रेल्वेवर पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामाला गती देण्यासाठी या मार्गावरील सेवा सलग ३ महिने बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत.
मुंबई सेंट्रल ते बोरीवली दरम्यान ५ व्या आणि ६ व्या मार्गिकेच्या कामाला वेग देण्यासाठी गोरेगाव ते सीएसएमटी दरम्यानची हार्बर सेवा आगामी काळात सलग तीन महिने बंद ठेवली जाणार आहे. वांद्रे आणि खार दरम्यानचा जुना रेल्वे पूल पाडून तिथे नवीन मार्गिका तयार करण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव ते वांद्रे दरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद असणार आहे. सलग ९० दिवस म्हणजेच ३ महिने या मार्गावरील वाहतूक बंद असणार आहे. यावेळी वांद्रे ते सीएसएमटी दरम्यान काही मर्यादित लोकल चालवल्या जातील. पण गोरेगावच्या प्रवाशांना वांद्रे गाठण्यासाठी पर्यायी मार्ग शोधावा लागेल. या मोठ्या प्रकल्पासाठी रेल्वे प्रशासन सुमारे ९६५ कोटी रुपये खर्च करत आहे.
रेल्वेला मुंबई सेंट्रल ते बोरीवली दरम्यान दोन नवीन ट्रॅक (५ वी आणि ६ वी मार्गिका) टाकायचे आहेत. यासाठी वांद्रे आणि खार स्थानकांदरम्यान एक जुना रेल्वे पूल आहे, जो पाडणे अत्यंत गरजेचे आहे. हा पूल पाडून नवा पूल बांधल्याशिवाय नवीन मार्गिका तयार होऊ शकत नाही. आधी हे काम ६ महिने चालणार होतं, पण प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी ते आता ३ महिन्यात पूर्ण करण्याचं आव्हान रेल्वेने घेतलं आहे.
या निर्णयामुळे दररोज प्रवास करणाऱ्या सुमारे ३.६२ लाख प्रवाशांचे हाल होणार आहेत. या काळात गोरेगाव-सीएसएमटी मार्गावरील ८८ फेऱ्या आणि वांद्रे-सीएसएमटी मार्गावरील १०६ फेऱ्यांवर याचा परिणाम होईल. या काळात पश्चिम रेल्वेवरून हार्बर मार्गे मध्य रेल्वेकडे जाणाऱ्या प्रवाशांना आता अंधेरी किंवा दादर मार्गे जावे लागेल, ज्यामुळे तिथे गर्दी वाढण्याची शक्यता आहे. सेवा खंडित असल्याने प्रवाशांना बस किंवा इतर साधनांचा वापर करावा लागेल, ज्यामुळे प्रवासाचा वेळ वाढेल.
हा ३ महिन्यांचा त्रास सहन केल्यानंतर भविष्यात मोठे फायदे मिळणार आहेत. नवीन मार्गिका तयार झाल्यामुळे चर्चगेट ते विरार दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढवता येतील. तसेच लांब पल्ल्याच्या (Express) गाड्यांसाठी वेगळा ट्रॅक मिळाल्याने लोकल गाड्यांना आता एक्स्प्रेससाठी थांबावे लागणार नाही. परिणामी, लोकल वेळेवर धावतील.