BMC Election : मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर, यादीत कोण-कोण?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तेजस्वी घोसाळकर आणि नील सोमय्या यांच्यासह १२५ उमेदवारांना AB फॉर्म वाटप करण्यात आले आहेत.

BMC Election : मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर, यादीत कोण-कोण?
bjp devendra fadnavis
| Updated on: Dec 29, 2025 | 7:43 AM

राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपने आपली रणनीती स्पष्ट करत उमेदवारांना AB फॉर्म वाटप करण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपच्या पहिल्या यादीत १२५ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने नवीन युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

मध्यरात्रीपासून भाजप कार्यालयात लगबग

दादर येथील भाजपचे कार्यालय वसंत स्मृती येथे रविवारी रात्री १ वाजेपासूनच इच्छुक उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ज्या जागांवर महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटला आहे, अशा जागांच्या उमेदवारांना तातडीने बोलावून पहाटेपर्यंत फॉर्मचे वाटप करण्यात आले.

पहिला AB फॉर्म कोणाला?

मुंबई भाजपच्या वतीने पहिला AB फॉर्म तेजस्वी घोसाळकर यांना देण्यात आला आहे. त्या वॉर्ड क्रमांक २ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्यासोबतच अर्चना भालेराव यांच्यासह सुमारे १० ते १५ उमेदवारांनी पहाटेपर्यंत एबी फॉर्म देण्यात आले. भाजपने यावेळी अनुभवी माजी नगरसेवकांसोबतच नव्या दमाच्या युवा नेत्यांवर विश्वास दाखवला आहे.

कोणाकोणाला उमेदवारी?

  • नील सोमय्या: मुलुंड पश्चिम (वॉर्ड क्रमांक १०७) मधून निवडणूक लढवणार.
  • तेजिंदर सिंग तिवाना: वॉर्ड क्रमांक ४७ मधून रिंगणात.
  • शिवानंद शेट्टी: माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांना वॉर्ड क्रमांक ९ मधून पुन्हा संधी.
  • नवनाथ बन: प्रभाग क्रमांक १३५ मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार

प्रस्थापित नेत्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी

दरम्यान या निवडणुकीत भाजपने मिशन १५० चे लक्ष्य ठेवले आहे. मुंबईवर आपली पकड मजबूत करण्यासाठी भाजपकडून सर्व ताकद पणाला लावली आहे. विशेषतः प्रस्थापित नेत्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने पक्षात काही ठिकाणी नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता आहे. तरी विजयाची खात्री असलेल्या उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात आल्याचे माहिती समोर येत आहे. आता उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मुंबईच्या राजकीय मैदानात नेमकी कोणती उलथापालथ होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.