मुंबई पोलिसांना मोठं यश, शहरातून हरवलेल्या 161 मुलांचा शोध, 2025 पासून…

मुंबई पोलिसांनी हरवलेल्या मुलांना शोधण्यात चांगलं यश मिळवलं आहे. 2026 मध्ये आतापर्यंत 178 अल्पवयीन मुलं बेपत्त झाली होती. त्यापैकी 161 अल्पवयीन मुलांना शोधण्यात मुंबई पोलिसांना यश मिळालं आहे.

मुंबई पोलिसांना मोठं यश, शहरातून हरवलेल्या 161 मुलांचा शोध, 2025 पासून...
Mumbai Police
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 22, 2026 | 9:35 AM

मुंबई शहरातून बेपत्ता झालेल्या मुलांबाबत सतत अनेक वृत्त समोर येतात. परंतु या बेपत्ता मुलांचा नंतर शोध लागतो का, हा आकडा दिवसेंदिवस वाढत का जातोय, असे अनेक प्रश्न नागरिकांसमोर आहेतच. अशातच मुंबई पोलिसांनी या मुलांचा शोध घेण्यासाठी कंबर कसलेली आहे. हरवलेल्या मुलांचा शोध घेण्याचं काम पोलिसांकडून प्राधान्यक्रमाने केलं जातंय. 2025 मध्ये शहरातून बेपत्ता झालेल्या 2182 मुलांपैकी 2165 मुलांचा पोलिसांनी सुरक्षितपणे शोध घेतला आहे. या सर्व मुलांना त्यांच्या पालकांकडे सोपवण्यात आलं आहे. म्हणजेच जवळजवळ 99 टक्के हरवलेली मुलं सुरक्षितपणे सापडली आहेत. 2026 मध्येही पोलिसांनी हे काम धडाडीने सुरूच ठेवलं असून आतापर्यंत बेपत्ता झालेल्या 0 ते 5 वयोगटातील सर्व सात मुलांना शोधून काढलं आहे. मुंबई पोलिसांचं हे मोठं यश मानलं जात आहे.

याविषयी सह पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी म्हणाले, “कमी वयातील आणि अगदी लहान मुलांशी संबंधित प्रकरणांना अधिक प्राधान्य दिलं जात आहे. त्यामुळे आतापर्यंत या वर्षातील मुलांची रिकव्हरी ही शंभर टक्के आहे.” 2026 च्या सुरुवातीच्या महिन्यांतच जवळपास 178 अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्याचं वृत्त होतं. मुंबई पोलिसांच्या त्वरित कारवाईनंतर त्यापैकी 161 मुलं साडपली आहेत. तर 17 अल्पवयीन, ज्यामध्ये 8 मुलं आणि 9 मुलींचा समावेश आहे, ते अजूनही बेपत्ताच आहेत. बेपत्ता झालेली ही सर्व मुलं 16 ते 18 वयोगटातील आहेत.

इतर अल्पवयीन मुलांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण देशात स्पेशल टीम तैनात करण्यात आले आहेत. सध्या त्यांचं स्थळ ट्रॅक करण्यासाठी आणि त्यांना पुन्हा त्यांच्या पालकांकडे सुरक्षितरित्या सोपवण्यासाठी तीन ते चार पथकं भारताच्या वेगवेगळ्या भागात कार्यरत आहेत. 2025 मध्ये शोधलेल्या 2165 मुलांपैकी 55 टक्के मुलं आणि 45 टक्के मुली होत्या. काही अल्पवयीन मुलं घरच्यांशी भांडून पळून मुंबईत येतात. तर मुंबईतील रेल्वेगाड्या आणि रेल्वे परिसरातील गर्दीमुळे अनेक लहान मुलांची पालकांशी ताटातूट होते आणि मुलं हरवतात.

दादर, सीएसएमटी आणि मुंबई सेंट्रल या तीन महत्त्वाच्या ठिकाणी जिल्हा बाल संरक्षण कक्षांतर्गत रेल्वे चाइल्ड हेल्प डेस्कसुद्धा कार्यरत आहेत. संकटात सापडलेल्या किंवा हरवलेल्या मुलांना तातडीने मदत मिळावी म्हणून हे डेस्क तैनात आहेत.