Mumbai rains: मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून 6 हजार कोटी खर्च, तरीही मुंबई पाण्यात; वाचा सविस्तर

| Updated on: Jul 20, 2021 | 1:03 PM

मुंबईत तीन दिवस पावसाने जोर धरला. त्यामुळे मुंबईची दाणादाण उडाली. अनेक ठिकाणी पाणी साचलं. अनेकांच्या घरात आणि सोसायट्यांमध्ये पाणी आलं. (heavy rain in mumbai)

Mumbai rains: मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून 6 हजार कोटी खर्च, तरीही मुंबई पाण्यात; वाचा सविस्तर
heavy rain in mumbai
Follow us on

मुंबई: मुंबईत तीन दिवस पावसाने जोर धरला. त्यामुळे मुंबईची दाणादाण उडाली. अनेक ठिकाणी पाणी साचलं. अनेकांच्या घरात आणि सोसायट्यांमध्ये पाणी आलं. ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आणि लोक पाण्यात अडकून पडले. त्यामुळे पालिकेची पुन्हा एकदा पोलखोल झाली आहे. विशेष म्हणजे महापालिकेने मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून गेल्या 16 वर्षात विविध उपययोजनांसाठी तब्बल 6 हजार कोटींहून अधिक रक्कम खर्च केली. त्यानंतरही मुंबई तुंबल्याने महापालिकेचे 6 हजार कोटी रुपये पाण्यात गेल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. (Mumbai rains: 6 thousand Crore spent by BMC in 16 year, all washed away)

मुंबई महापालिकेने गेल्या 16 वर्षांत ब्रिमस्टोवॅड प्रकल्प, मिठी नदी रुंदीकरण, सहा पम्पिंग स्टेशन, पर्जन्यजलवाहिन्या सुधारणा यासाठी तब्बल सहा हजार कोटींहून अधिक पैशांचा चुराडा करण्यात आला. तरीही मुंबईत पाणी तुंबण्याची समस्या कायम असल्याचं दिसून आलं आहे, असं पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितलं. जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्या समितीने केलेल्या शिफारशींपैकी जवळपास सर्व शिफारशी पालिकेने अंमलात आणल्यानंतरही पावसाळ्यात परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे पालिकेच्या उपाययोजनांवरच आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.

सर्व ‘प्रयोगा’नंतरही मुंबई तुंबली

मुंबईत 26 जुलै 2005 रोजी झालेल्या महाप्रलयानंतर राज्य सरकारने डॉ. चितळे यांची समिती नेमली होती. या समितीने महापालिकेला ब्रिमस्टोवॅड प्रकल्पासह विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यास सांगितले होते. त्यानुसार 16 वर्षांत पालिकेने ते सर्व ‘प्रयोग’ करून पाहिल्यानंतरही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली दिसून येत नाही, असं रवी राजा यांनी सांगितलं.

माहुल पंपिंग स्टेशन लवकरच सुरू होणार

ब्रिमस्टोवॅडचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाअंतर्गत पर्जन्यजलवाहिन्यांची पाणी वाहून नेण्याची प्रती तास क्षमता 25 मिमीवरून 50 मिमी करण्यात आली आहे. तसेच नाल्यांचे रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षक भिंती ही कामे करण्यात आली आहेत. या सर्वांसाठी पालिकेने 2 हजार 238 कोटी रुपये खर्च केले आहेत. अतिवृष्टीच्या काळात समुद्राला येणाऱ्या मोठ्या भरतीच्या वेळेत मुंबईच्या विविध भागांत साचणाऱ्या पाण्याचा जलदगती निचरा करण्यासाठी ईर्ला, वरळी, लव्हग्रोव्ह, ब्रिटानिया, क्लिव्हलँड, गझदरबंध, मोगरा व माहूल या आठ ठिकाणी पम्पिंग स्टेशन प्रस्तावित केली होती. त्यापैकी सहा स्टेशनची कामे पूर्ण होऊन सुरू झाली आहेत. माहुलचे काम लवकरच सुरू होणार आहे. सहा पम्पिंग स्टेशनसाठी महापालिकेने 600 कोटींहून अधिक पैसे खर्च केले आहेत.

15 वर्षांपासून मिठीचे काम सुरूच

मिठी नदीचे काम तब्बल 15 वर्षांनंतरही सुरूच आहे. नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षक भिंती, नदी परिसराचे सुशोभिकरण, नदी परिसरात सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प यासह विविध प्रकारची कामे करण्यात आली आहेत.

भूमिगत टाक्यांचं काम सुरू

तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी हिंदमाता उड्डाणपुलाखाली अडीच हजार क्युबिक मीटर, परळ येथील सेंट झेवियर मैदानात 30 हजार क्युबिक मीटर, दादर पश्चिमेला प्रमोद महाजन उद्यानात सुमारे 60 हजार क्युबिक मीटर आणि दक्षिण मुंबईत गोल देऊळ भागात पाणी साठवण्यासाठी भूमिगत टाक्या बांधल्या जात आहेत. या टाक्यांमध्ये साठवलेले पाणी पर्जन्यजलवाहिन्यांमार्फत समुद्रात सोडले जाणार आहे. यासाठी 500 कोटींहून अधिक खर्च केला जाणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Mumbai rains: 6 thousand Crore spent by BMC in 16 year, all washed away)

 

संबंधित बातम्या:

बीएमसीच्या पार्किंगमध्ये साचलेलं 20 फूट पाणी ओसरलं, 450 गाड्या नादुरुस्त, वाहनचालकांचा संताप

बोरिवलीतील नुकसानग्रस्त दुकानांचे त्वरित पंचनामे करून व्यापाऱ्यांना दिलासा द्या; प्रविण दरेकरांचे निर्देश

‘विठ्ठलाची कितीही सेवा केली तरी महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला विठ्ठल माफ करणार नाही’, निलेश राणेंचा हल्लाबोल

(Mumbai rains: 6 thousand Crore spent by BMC in 16 year, all washed away)