पायल तडवी आत्महत्या प्रकरण, कोर्टात दोन्ही बाजूंचा जोरदार युक्तिवाद

| Updated on: May 29, 2019 | 5:58 PM

मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय. पायलचा केवळ मानसिकच नाही, तर शारीरिक छळही करण्यात आल्याचा दावा पीडित कुटुंबीयांच्या वकिलाने केलाय. तर पायलची आत्महत्या तिच्या वैयक्तिक कारणातूनही झाली असू शकते, असं आरोपींच्या वकिलाने म्हटलंय. आरोपी असलेल्या तीनही महिला डॉक्टर्सना आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली होती. तीनही आरोपींना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. […]

पायल तडवी आत्महत्या प्रकरण, कोर्टात दोन्ही बाजूंचा जोरदार युक्तिवाद
Follow us on

मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय. पायलचा केवळ मानसिकच नाही, तर शारीरिक छळही करण्यात आल्याचा दावा पीडित कुटुंबीयांच्या वकिलाने केलाय. तर पायलची आत्महत्या तिच्या वैयक्तिक कारणातूनही झाली असू शकते, असं आरोपींच्या वकिलाने म्हटलंय. आरोपी असलेल्या तीनही महिला डॉक्टर्सना आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली होती. तीनही आरोपींना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला. सत्र न्यायालयाने या तीनही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कोर्टात सुनावणीदरम्यान तीनही आरोपी डॉक्टरांच्या बाजूने प्रसिद्ध वकील आबात पोंडा आणि संदीप बाला यांनी बाजू मांडली. पोलिसांकडे गुन्हा दाखल करताना फक्त मागासवर्गीय म्हणून पायलचा उल्लेख करण्यात आलाय. त्यावरून ती एससी किंवा एसटी या जातीतली आहे हे सिद्ध होत नाही, तर ओबीसीसुद्धा असू शकते. पोलिसांकडे देण्यात आलेल्या कोणत्याही तक्रारीत आदिवासी म्हणून उल्लेख नाही, त्यामुळे ही केस अट्रोसिटीची होऊ शकत नाही. शिवाय व्हाट्सअपवरील संभाषणात सुद्धा आदिवासी किंवा ती अन्य कुठल्या जातीची म्हणून संभाषण असल्याचं पोलीस तपासात समोर आलेलं नाही. मृत मुलीने आपल्या आईला सांगितलं होतं की तिने आपली जात कोणालाही सांगितलेली नाही, असं वकिलांनी म्हटलंय.

दरम्यान, पायल तडवीच्या बाजूने लढणारे वकील नितीन सातपुते यांनी मात्र कोर्टात एक वेगळा दावा केला. पायल तडवीचा केवळ मानसिक छळ नसून शारीरिक छळसुद्धा करण्यात आला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली, त्यामुळे भा.द.वी. कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी केली. पायल तडवीच्या मृतदेहावर जखमा असल्याचं वकील नितीन सातपुते यांनी म्हटलंय.

सुनावणीदरम्यान हे प्रकरण अट्रोसिटीचं नसल्याचा युक्तिवाद आरोपी डॉक्टरांच्या वकिलांनी केला. शिवाय आत्महत्या केलेल्या पायलचे नुकतेच लग्न झालेले असूनही ती तिच्या पतीसोबत राहत नव्हती. याचा अर्थ त्यांच्या कौटुंबीक जीवनातही कलह होता, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केलाय. 31 मे रोजी या प्रकरणाची पुन्हा सुनावणी होणार असून या प्रकरणाला नक्की कोणते वळण मिळणार हे पाहणे महत्वाचे आहे.