मोदी सरकारला शेतकऱ्यांसोबत युद्ध करायचे आहे का?; राष्ट्रवादीचा संतप्त सवाल

| Updated on: Feb 03, 2021 | 11:02 AM

शेतकरी आंदोलकांना रोखण्यासाठी गाझीपूर बॉर्डरवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. (nawab malik slams bjp over farmers protest)

मोदी सरकारला शेतकऱ्यांसोबत युद्ध करायचे आहे का?; राष्ट्रवादीचा संतप्त सवाल
नवाब मलिक, अल्पसंख्यांक आणि कौशल्य विकास मंत्री
Follow us on

मुंबई: शेतकरी आंदोलकांना रोखण्यासाठी गाझीपूर बॉर्डरवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. रस्त्यावर तारांचं कुंपण घालण्यात आलं असून रस्त्यांवर खिळे ठोकण्यात आले आहेत. तसेच अनेक ठिकाणी आंदोलकांना अडवण्यासाठी भररस्त्यात भिंती उभारण्यात आल्या आहेत. युद्धजन्य परिस्थिती सारखं वातावरण गाझीपूर बॉर्डरवर तयार करण्यात आलं असल्याने त्यावर राष्ट्रवादीने संताप व्यक्त केला आहे. मोदी सरकारला शेतकऱ्यांसोबत युद्ध करायचे आहे का? असा सवाल राष्ट्रवादीने व्यक्त केला आहे. (nawab malik slams bjp over farmers protest)

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना हा संताप व्यक्त केला आहे. दिल्लीत इंडिया-चायना बॉर्डरसारखी परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे. मोदी सरकारला शेतकऱ्यांसोबत युद्ध करायचे आहे का?, असा सवाल मलिक यांनी केला आहे. पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानमध्ये आपल्याला मतदान झालं असं भाजपला वाटतं. तिथे आपल्याला कुणीच विरोध करणार नाही, असा भाजपचा गैरसमज आहे. लक्षात ठेवा राकेश टिकैत हे शेतकऱ्यांचे मोठे नेते आहेत. पंजाबच नव्हे तर पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानात त्यांना मोठा वर्ग आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजपला झटका बसू शकतो, असं मलिक म्हणाले. मागच्यावेळी शेतकऱ्यांनी खाट टाकून आंदोलन केलं होतं, याची आठवणही त्यांनी करून दिली.

पोलीसच तुमचं ऐकणार नाही असं होऊ नये

शेतकरी कायदा मॉडेल अॅक्ट म्हणून का पारित केला नाही. देशावर हा कायदा थेट का लादला? देशावर हा कायदा थेट लाटणं चुकीचं आहे. मी घेईन तोच निर्णय योग्य अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पद्धत आहे. लोकशाहीत अशी पद्धत चालत नाही, असं सांगतानाच आता दिल्लीच्या सीमेवर युद्धासारखी परिस्थिती आहे. तिथे मिलिट्री लावून युद्ध करणार आहात का? असा सवाल त्यांनी केला. वेळीच शेतकऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय घ्या. सर्व काही पोलिसांवर सोडू नका. नाही तर पोलीसच तुमचा आदेश मानणार नाहीत, असं होऊ नये, असंही ते म्हणाले.

मविआचा पहिल्या दिवसापासून पाठिंबा

महाविकास आघाडीने पहिल्या दिवसापासून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये तर राज्यात हा कायदा लागू करायचा नाही असा निर्णय आम्ही घेतला आहे. देशभर हे आंदोलन पसरू नये असं आम्हाला वाटतं. त्यासाठी केंद्राने तात्काळ निर्णय घेऊन तोडगा काढावा, असंही ते म्हणाले.

हा उद्योग नवा नाही

यावेळी त्यांनी ईडीच्या चौकशीवरूनही केंद्र सरकारवर टीका केली. ईडीची चौकशी म्हणजे सत्तेचा दुरुपयोग आहे. हा उद्योग नवा नाही, असं म्हणत मलिक यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं. (nawab malik slams bjp over farmers protest)

उद्धव-मुनगंटीवार एकमेकांचे शत्रू नाहीत

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार माझ्यासमोरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटायला सह्याद्री गेस्ट हाऊसला आले होते. दोन्ही नेत्यांचे वेगळे विचार आहेत. पण ते एकमेकांचे शत्रू आहेत, असं म्हणणं योग्य नाही. महाराष्ट्राला वेगळी परंपरा आहे. विरोधकांशीही चांगले संबंध ठेवण्याची यशवंतरावांच्या काळापासूनची ही परंपरा आहे, असंही त्यांनी सांगितलं. (nawab malik slams bjp over farmers protest)

 

संबंधित बातम्या:

धरणे आंदोलनात गुन्हा केल्यास सरकारी नोकरी नाही; बिहार पोलिसांचे फर्मान

Kunal Kamra | ट्रॅक्टर आणि बुलडोझरचा फोटो ट्विट, संजय राऊत-राकेश टिकैत भेटीवर कुणाल कामराचं भाष्य

मुख्यमंत्रीजी, तुम्ही दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांसोबत असायला हवं, आपच्या खासदाराचा सवाल

(nawab malik slams bjp over farmers protest)