अमित शाह यांच्यासोबत काय चर्चा झाली? सुनील तटकरे यांनी सांगितली आतली बातमी, काय घडणार?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची महायुतीच्या नेत्यांसोबत जागावाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या बैठकीत काय-काय ठरलं याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. दरम्यान, खासदार सुनील तटकरे यांनी या बैठकीबाबतची आतली बातमी सांगितली आहे.

अमित शाह यांच्यासोबत काय चर्चा झाली? सुनील तटकरे यांनी सांगितली आतली बातमी, काय घडणार?
अजित पवार आणि अमित शाह यांचा फोटो
Chetan Patil | Updated on: Sep 09, 2024 | 6:58 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसीय मुंबई दौरा संपल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी आतली बातमी सांगितली आहे. अमित शाह रविवारी रात्री मुंबईत आले. अमित शाह यांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची काल रात्री उशिरा महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित होते. तसेच अमित शाह यांनी आज दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी जावून गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं तरी अजित पवार त्यांच्या भेटीसाठी गेले नाहीत. अमित शाह यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत होते. पण अजित पवार तिथे दिसले नाही. याबाबत जोरदार चर्चा झाल्यानंतर अमित शाह दिल्लीत परतत असताना अजित पवार यांनी मुंबई विमानतळावर जावून त्यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहेत. दरम्यान, अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत जागावाटपाबाबत काय चर्चा झाली? याबाबत अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले नेते सुनील तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

“अमित शाह यांच्यासोबत जागावाटपाबाबत चर्चा झाली. सर्वांसाठी सन्मानपूर्वक जागावाटप केली जाईल, एवढीच चर्चा यावेळी झाली. याबाबत स्वत: अमित शाह जागावाटपासाठी आवश्यकता असेल तेव्हा वेळ देतील”, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली. यावेळी सुनील तटकरे यांना जागावाटपाबाबत सध्या सुरु असलेल्या विविध चर्चांबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी “आम्ही प्रत्याक्षात जागावाटपाबाबत चर्चा केली तेव्हा अशी चर्चा झालेली नाही. एकदा आम्ही नागपूरमध्ये चर्चा करण्यासाठी बसलो होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, मी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आम्ही सर्व चर्चा करण्यासाठी बसलेलो होतो. कोणत्याही परिस्थितीत सर्व 288 जागा महायुतीने लढवायच्या आणि पुन्हा राज्यात महायुतीचं सरकार आणायचं, बहुमत मिळवायची, अशी आमची चर्चा झाली होती. जागावाटपाच्या चर्चा नक्कीच प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करेल. आम्ही योग्यवेळी त्याबाबत प्रखरपणाने चर्चा करु. जागावाटपाबाबत सर्वा अंतिम निर्णय दिल्लीतच होणार आहे. ज्यावेळेला आवश्यकता असेल त्यावेळी नक्तीच बैठक होईल”, असं सुनील तटकरे यांनी सांगितलं.

बारामतीला उमेदवार बदलणार? सुनील तटकरे काय म्हणाले?

सोशल मीडियावर गब्बर नावाच्या व्यक्तीकडून एक पत्र व्हायरल झालंय. लोकसभेत बारामतीमध्ये वैनींना पाडलं आता दादांना पाडा, असं सांगणार अज्ञात इसमाचं पत्र व्हायरल झालंय. या पत्राबाबत सुनील तटकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. “मी तसं पत्र पाहिलेलं नाही आणि वाचलेलं नाही. एक गोष्ट नक्की आहे की, अजित पवार यांचं बारामतीचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी मोठं योगदान दिलं. ते 1991 मध्ये ते संसदेत गेले. त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार संरक्षण मंत्री झाल्यानंतर अजित पवार विधीमंडळात गेले. तेव्हापासून ते आजपर्यंत अजित पवारांनी जी बारामती घडवली, देशामध्ये आज बारामतीकडे रोल मॉडेल म्हणून बघितलं जातं, त्यामध्ये सर्वाधिक सिंहाचा वाटा अजित पवार यांचा आहे. बारामतीकर नक्कीच सुज्ञ आहेत. ते या संदर्भातला योग्य निर्णय घेतील आणि फार मोठ्या फरकाने आम्हाला बारामतीत जिंकून देतील”, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.

“बारामतीच्या उमेदवारीबाबत वेगळा विचार होण्याचं आमच्याकडे काही कारण नाहीच. अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांची काल बैठक होती. अजित पवारांची एक वेगळी शैली आहे. त्या पद्धतीने ते संपूर्ण राज्यात संवाद करत असतात. ते आपल्या होमटाऊनवर गेल्यानंतर त्यांची संवाद करण्याची शैली वेगळी आहे. त्यातून ते बोलले असावेत”, असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं.

सुनील तटकरे यांचा जितेंद्र आव्हाडांना टोला

“जे विरोधक याबाबत टीका-टीप्पणी करतात, त्यांचं त्यांच्याच मतदारसंघात काय स्थान आहे ते आम्ही आगामी निवडणुकीत दाखवू. अजित पवार यांच्याबाबत बोलल्यानंतर सहज प्रसिद्धी मिळते. अशी प्रसिद्धीची हव्या असणारे काही महाभाग आहेत. त्यामुळे ते टीका-टीप्पणी करत आहेत. हेच टीका-टीप्पणी करणारे अजित पवार यांच्या पाठिमागे कशाप्रकारे लागत होते, त्यांच्या वैयक्तिक कामांसाठी सतत येत होते, माझ्यासारख्याने ते अनुभवलेलं आहे, मला या विषयावर अधिक बोलायचं नाही”, असा टोला सुनील तटकरे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना लगावला.

Follow Us