Nitesh Rane: मुंबईला तुंबई करून देशात बदनाम करणार आहात का?; नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्रं

| Updated on: May 16, 2022 | 10:12 AM

Nitesh Rane: राज्य सरकार व पालिका प्रशासन यावर काही क़ायम स्वरूपी धोरण आखणार आहें का? नागरिकांना संभाव्य आपत्तीकाळात काय खबरदारी घेतली पाहिजे यावर काही जनजागरण केलं आहें का?

Nitesh Rane: मुंबईला तुंबई करून देशात बदनाम करणार आहात का?; नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्रं
गिरगाव चौपाटीवर सीआरझेडचं उल्लंघन, नितेश राणे यांचा दावा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: पावसाळा तोंडावर आलेला असून अजूनही मुंबईतील नालेसफाईचं काम पूर्ण झालं नाही. त्यावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्रं लिहिलं आहे. मुंबईला तुंबई करून देशात बदनाम करणार आहात का? असा सवाल नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. राज्य सरकार व पालिका प्रशासन (bmc) या संवेदनशील मुद्यावर विविध विभागांचे मत लक्षात घेता काही धोरण आखणार आहे का? तेथील नागरिकांना अशा संभाव्य आपतीजन्य परिस्थितीत काय उपाययोजना करायच्या असतात या विषयी आपण काही जनजागरण केलं आहे का? या सर्व प्रश्नांचे आपण समाधान साधणार आहात की नेहमीप्रमाणे मुंबईला (mumbai) तुंबई म्हणून देश व जागतिक स्तरावर बदनाम करणार आहात, असं सवाल नितेश राणे यांनी केला आहे. नितेश यांनी मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्रं लिहून हा सवाल केला आहे.

पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते अशीच मुंबईची ओळख सातत्यानं प्रसारमाध्यमे देतात. परंतु या तुंबलेल्या मुंबईत अनेकांनी आपले हकनाक जीव गमावले तरीही त्यावर ठोस उपाययोजना म्हणून मुंबई महापालिकेत दिर्घकाळ सत्ता भोगणारी शिवसेना मात्र काहीही करू शकलेली नाही. मुंबईला नुसती ठेकेदारांच्या फायद्यासाठी रंगरंगोटी आणि देखावा करून गतवैभव प्राप्त होणार नाही. त्यासाठी जनतेच्या मुळ समस्येकडेपण लक्ष दिले पाहिजे. यावर्षी चांगला पाऊस होण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत, असं नितेश राणे यांनी पत्रात नमूद केलं आहे.

हे सुद्धा वाचा

 

26 जुलैच्या पुनरावृत्तीची भिती

त्यामुळे पावसाळ्यात मुंबईची काय परिस्थिती असेल याची कल्पना करवत नाही. तुंबणाऱ्या या मुंबईत 386 धोक्याचे ठिकाणं आहेत. ज्याला आपण फ्लडिंग पॉईंटस म्हणतो. यापैकी 28 ठिकाणं एकाच पश्चिम विभागतील आहेत. फक्त मांटुंगा, वडाळा, सायन भागतच यातील 25 फ्लडिंग पॉईंट्स आहेत. यंदाच्या पावसाळ्यात समुद्राला 22 दिवस भरतीही असणार आहे. त्यामुळे मुंबईत सलग 250 मिली पेक्षा अधिक पाऊस पडला तर मुंबईला 26 जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल का काय? अशी भिती व्यक्त केली जातेय, याकडेही त्यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे.

पंप लावण्यापलिकडे काय उपाययोजना आहेत?

पावसाच्या पाण्याचा निचरा या फ्लडिंग पॉईंट्स येथून झाला नाही तर मुंबईकरांना भीषण परिस्थितीचं तोंड द्यावं लागेल. या फ्लडिंग पाईंट्स येथे पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावण्याच्या पलिकडे आपण काय उपाय योजना केल्या आहेत? हे आम्हा जनतेस कळाले पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे. राज्य सरकार व पालिका प्रशासन यावर काही क़ायम स्वरूपी धोरण आखणार आहें का? नागरिकांना संभाव्य आपत्तीकाळात काय खबरदारी घेतली पाहिजे यावर काही जनजागरण केलं आहें का?, असा सवालही त्यांनी केला आहे.