महाविकास आघाडीत बिघाडी? काँग्रेस आणि ठाकरे गटात सारं काही आलबेल नाही?

विधान परिषदेच्या निवडणुकीत ठाकरे गटाने परस्पर उमेदवार दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे. कोकण आणि नाशिकच्या जागेवरील उमेदवार मागे घ्या, अशी मागणी काँग्रेसने ठाकरे गटाकडे केली आहे.

महाविकास आघाडीत बिघाडी? काँग्रेस आणि ठाकरे गटात सारं काही आलबेल नाही?
नाना पटोले आणि उद्धव ठाकरे
Chetan Patil | Updated on: Jun 11, 2024 | 5:07 PM

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष ठरला. काँग्रेसला महाराष्ट्रात सर्वाधिक 13 जागांवर यश मिळालं. त्यापाठोपाठ महाविकास आघाडीत ठाकरे गटाला 9 आणि शरद पवार गटाला 8 जागांवर यश मिळालं. या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास निश्चितच वाढला आहे. असं असलं तरी काँग्रेस आणि ठाकरे गटात सध्या सारं काही आलबेल नाही, असं चित्र बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकीमुळेच काँग्रेस आणि ठाकरे गटात आलबेल नाही का? असा प्रश्न आता निर्माण होतोय. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना फोन केले. पण त्यांच्याशी संपर्क झाला नाही, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत. ठाकरे गटाकडून विधान परिषदेच्या चारही जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

ठाकरे गटाने परस्पर उमेदवार दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे. कोकण आणि नाशिकच्या जागेवरील उमेदवार मागे घ्या, अशी मागणी काँग्रेसने ठाकरे गटाकडे केली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार जाहीर केले, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सारं काही आलबेल नाही, असं स्पष्ट होत आहे.

नाना पटोले आणखी काय म्हणाले?

याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण येऊ नये म्हणून नाना पटोले यांनी सारं काही आलबेल आहे, असं सूचित करण्याचा प्रयत्न केला. “कोणतीही नाराजी नाही किंवा मतभेद नाहीत. सर्व खासदार त्यांना भेटत आहेत. सर्वांसोबत चर्चा होत आहे. चर्चा तर होईलच, चर्चा का नाही होणार. उद्धव ठाकरे यांच्यासोबत अजून बातचित झालेली नाही. बातचित नक्की होईल. महाविकास आघाडी म्हणून आम्ही काम करु. सर्वांनी एकत्रित चर्चा करुन विधान परिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा व्हावी, अशी आमची इच्छा होती”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान कधी?

विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी येत्या 26 जूनला मतदान होणार आहे. याआधी ही तारीख 7 जून होती. पण शाळांना सुट्टी असल्याच्या कारणास्तव शिक्षक संघटनांनी मतदानाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली होती. या निवडणुकीसाठी आता प्रत्येक पक्ष कंबर कसताना दिसत आहेत.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us