‘इंडिया आघाडी आता शिल्लक राहिलेली नाही’, प्रकाश आंबेडकर यांचं सर्वात मोठं वक्तव्य

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. इंडिया आघाडी आता शिल्लक राहिलेली नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

इंडिया आघाडी आता शिल्लक राहिलेली नाही, प्रकाश आंबेडकर यांचं सर्वात मोठं वक्तव्य
Chetan Patil | Updated on: Feb 02, 2024 | 5:04 PM

मुंबई | 2 फेब्रुवारी 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा आगामी लोकसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी विरोधकांची एकमोट झालेली बघायला मिळाली होती. देशभरातील विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले होते. त्यांनी देशात नव्या आघाडीची स्थापना केली. या आघाडीचं नाव इंडिया आघाडी ठेवण्यात आलं. या आघाडीच्या पाटणा, नवी दिल्ली, बंगळुरु आणि मुंबई येथे मॅरेथॉन बैठका पार पडल्या. त्यामुळे भाजपपुढे इंडिया आघाडीचं कडवं आव्हान असेल असं मानल जात होतं. पण आता ही आघाडी शिल्लकच राहिलेली नाही, असं मोठं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी याबाबतचं वक्तव्य करत असताना काही उदाहरणे देखील दिले आहेत. तसेच देशात इंडिया आघाडीचं जसं झालं तसं महाविकास आघाडीचं होऊ देणार नाही, असंही वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज पुन्हा जागावाटपाबाबत बैठक पार पडली. मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली. इंडिया आघाडी शिल्लक राहिलेली नाही. मात्र महाविकास आघाडीचं इंडिया आघाडी होऊ देणार नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

“आमचं आता ठरलेलं आहे, या आघाडीचं इंडिया आघाडी होऊ नये अशी दक्षता घेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे ताक जरी असलं तरी फुकून फुकून प्यायचं असं मी ठरवलेलं आहे. इंडिया आघाडी आता शिल्लक राहिलेली नाही. अखिलेश आणि काँग्रेस जे शेवटचे पार्टनर राहिले होते, पण आता दोघेही वेगळे झाले आहेत. काँग्रेस आणि एसपी हे वेगळे चालले आहेत. ते होऊ नये अशी माझी इच्छा आहे”, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी बैठकीनंतर दिली.

भाजपला महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं कडवं आव्हान

विरोधकांच्या इंडिया आघाडीत एकजूट राहिलेली नाही असं सध्या चित्र दिसत असलं तरी महाराष्ट्रात तसं चित्र नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडी घट्ट पाय रोवून उभी आहे. महाविकास आघाडीचे नेते कोणत्याही परिस्थितीत आघाडी तुटू नये याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे महविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासाठी सारख्या चर्चा सुरु आहेत. महाविकास आघाडीत आता प्रकाश आंबेडकर यांनादेखील सहभागी करुन घेण्यात आलेलं आहे. पण प्रकाश आंबेडकर यांनी आपली फक्त ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासोबत युती झाल्याचं सांगितल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us