मुंबई : शिंदे-फडणवीस (Shinde Fadnavis Government) सरकारला दिलासा मिळाला आहे. कोर्टाच्या आधारे आमदारांना डिस्क्वालिफाय करता येईल, हा जो समझ होता, तो कोर्टाने धुडकावून लावला आहे. सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न फोल ठरला आहे, अशी टीका भाजपा नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते. महाविकास आघाडी आणि विशेषत: शिवसेनेवर त्यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, की एवढे सगळे झाल्यानंतर संजय राऊत आपली बेताल वक्तव्ये करण्याचे थांबवतील, असे वाटत होते, मात्र तसे होत नाही. संजय राऊत (Sanjay Raut) यांची भूमिका ही दुटप्पी आहे. न्यायव्यवस्था कुणाच्याही बाजूने नसते. न्याय व्यवस्थेवर विश्वास न दाखवणे घटनेवर अविश्वास दाखवण्यासारखे आहे, असा हल्लाबोल त्यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे बोलणे लुटुपुटूचे आहे. आज जे यश मिळत आहे त्याने हे पक्ष भयभीत झाले आहेत. जर धाडस असते तर निर्णय होण्याआधीच विरोध केला असता, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याची कल्पना आम्हाला नव्हती, असे विधान बाळासाहेब थोरात यांनी केले होते.
मुंबईकरांच्या हितासाठी मेट्रो महत्त्वाची आहे. आपल्या अहंकार आणि हट्टापोटी कुणी प्रकल्पाला खीळ घालू नये. मुंबईकराच्या हितासाठी हा प्रकल्प हे सरकार करेल. आता यापुढे एकही झाड तोडायचे नाही मग विषय येतो कुठे, असा सवाल दरेकर यांनी केला. तर केवळ जाणीवपूर्वक असे विषय पुढे करायचे काम सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.
देशाचे पंतप्रधान आणि भाजपाचे धन्यवाद मानतो, कारण पहिल्यांदाच राष्ट्रपतीपदासाठी आदिवासी महिला समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. प्रतिभा पाटील यांना बाळासाहेब ठाकरे यांनी समर्थन दिले होते. छोट्या विचारात न अडकता, प्रतिष्ठेचा विषय न करता त्यांना समर्थन देऊन द्रौपदी मुर्मू यांना समर्थन द्यावे, असे आवाहन प्रवीण दरेकर यांनी केले. लोकप्रतिनिधींच्या भावना सांभाळल्या नाहीत, तर काय होते, हे नुकतेच सर्वांनी पाहिले आहे, असेही दरेकर म्हणाले.