मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल

मोठी बातमी समोर येत आहे, मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये अचानक रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत.

मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 06, 2025 | 7:26 PM

मोठी बातमी समोर येत आहे, सीएसएमटी स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलनामुळे मध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.  कर्मचाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू आहेत. सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये मोटरमॅनचं आंदोलन सुरू आहे. पन्नास ते साठ मोटरमॅन अचानक सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये येऊन बसले आणि त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.

काही दिवसांपूर्वी मु्ंब्रा येथे एक मोठा अपघात झाला होता, ज्याची अंतर्गत चौकशी सुरू होती, ज्यामध्ये दोन इंजिनिअर जे आहेत, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र कर्मचाऱ्यांच्या युनियनने याला विरोध दर्शवला आहे. या इंजिनिअर विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्या विरोधात तसेच आपल्या काही मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मुंब्रा अपघात प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानं मोटर मॅन आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

काही दिवसांपूर्वी मुंब्रामध्ये दोन रेल्वे रुळ वरखाली होऊन एकमेकांच्या अगदी जवळ आल्याने प्रवासी घासले गेले होते, या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू तर 9 प्रवाशी जखमी झाल्याची घटना घडली होती. दरम्यान या प्रकरणात अंतर्गत चौकशीनंतर दोन रेल्वे अभियंत्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या विरोधात हे आंदोलन सुरू आहे.

रेल्वे अभियंत्यांनी पावसामुळे खचलेल्या जागेच्या दुरुस्तीचे काम वेळेत न करता दुर्लक्ष केल्यानेच हा अपघात झाल्याचं एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलं होतं.  पावसामुळे रुळाखालील खडी आणि माती वाहून गेल्याची कल्पना असतानाही रेल्वेचे सिनियर सेक्शन इंजिनियर समर यादव आणि असिस्टंट डिव्हिजनल इंजिनियर विशाल डोळस यांनी दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दोन लोकल एकमेकांना घासल्या गेल्याने झालेल्या या रेल्वे अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 9 जण जखमी झाले होते. मोठ्या पावसानंतर रेल्वे रुळाचे किरकोळ काम करून वेल्डिंग न केल्याने दोन रेल्वे रुळ वरखाली होऊन एकमेकांच्या अगदी जवळ आल्याने प्रवासी घासले गेले होते असा व्हिजेटीआयचा अहवाल आहे.