पावसाच्या पहिल्या काही सरीतच प्रशासन पडले उघडे, तीन दिवसात पाच दुर्घटना, शालेय विद्यार्थ्यासह चार जणांचा बळी

मुंबईत आणि आजूबाजूच्या महानगर पालिकांचा बोजवारा पहिल्या पावसाच्या फटक्याने उडाला आहे. चेंबूरात झाड कोसळुन शाळेच्या बसमधील विद्यार्थ्याचा बळी घेतला असतानाच आज घाटकोपर-साकीनाका येथे मॅनहोलने पादचाऱ्याचा बळी घेतला.

पावसाच्या पहिल्या काही सरीतच प्रशासन पडले उघडे, तीन दिवसात पाच दुर्घटना, शालेय विद्यार्थ्यासह चार जणांचा बळी
MONSOON DEATH
| Updated on: Jul 02, 2026 | 10:18 PM

मुंबईतील नालेसफाई खरे तर मान्सूनचा पहिला जोरदार माराच करत असतो. खवळलेला समुद्र मुंबईतील नालेसफाई करत असतो. मात्र, घाटकोपर येथील घटनेने दाखवून दिले आहे की अपघातातून प्रशासन काहीच शिकत नाही. २९ ऑगस्ट २०१७ रोजी प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ.दीपक अमरापूरकर पाणी साचल्याने कार सोडून घरी चालत जात असताना दीपक टॉकीज जवळील उघड्या मॅनहोलमधून वाहून गेले होते. अनेक दिवसांनी त्यांचा मृतदेह वरळी येथील समुद्रात सापडला होता.

पादचारी मॅनहोलमध्ये पडला..

ताजा घटनेत गुरुवारी दुपारी खैरानी रोडवर एका खुल्या मॅनहोलमध्ये ६० वर्षीय अस्लम शेख मोबाईलवर बोलत चालत असताना पडले.रस्त्या किनारी मॅनहोल खुल असल्याचे त्यांना दिसले नाही आणि त्यांचा हकनाक बळी गेला. कर्मचाऱ्यांनी शिडी लावून त्यांना काढण्याचा प्रयत्न केला, परंतू शिडी, चप्पल आणि छत्रीच हाती लागली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी कुत्रिम श्वसन यंत्रणा लावून आत उतरुन अस्लम इसाक शेख यांना बाहेर काढले, परंतू उशीर झाला होता. त्यांना राजावाडीत मृत घोषीत करण्यात आले. या प्रकरणी विधीमंडळात गदारोळ झाल्यानंतर एल. वॉर्डाच्या चार अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

ठाणे जिल्ह्यात दोन महिलांचा मृत्यू

गुरुवारी ठाण्याजिल्ह्यातील मुंब्रा येथील यास्मिन पार्क इमारतीतील तरुणी आलिया काही कामानिमित्त इमारतीतून बाहेर पडली आणि तिचा खुल्या वीज वाहिन्यांशी संपर्क झाल्याने तिला प्रचंड मोठा शॉक लागला. स्थानिकांच्या मदतीने तिला तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयात नेले तेथे तिला तपासून मृत घोषीत केले. डोंबिवलीतील हनुमान नगर भागात बुधवारी ४२ वर्षीय महिला शशी राहुल चक्र रस्त्यावरील खुल्या वीज तारांच्या संपर्कात आल्याने शॉक लागून तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तिच्या मागे तिचा पती राहुल चक्र आणि दोन लहान मुले आहेत. यानंतर स्थानिकांनी वीज मंडळावर आरोप केले आहेत. टिळकनगर पोलिस आता तपास करत आहेत.

शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू

३० जून रोजी शाळेच्या बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. चेंबूर येथील एका खाजगी शाळेची बस जात असताना तिच्यावर दुपारी एक मोठे झाड अचानक कोसळले. त्यात दहा विद्यार्थी जखमी झाले. ११ वर्षीय विहान श्रीवास्तव याचा जैन हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. या झाडाची मुळे रस्ता आणि ड्रेनेजच्या कामामुळे कापण्यात आली होती. त्यामुळे ७० वर्षे जुने झाड खंगून कमजोर झाले होते.

महापौरांच्या दौऱ्यात सुपरवायझर गटारात पडला –

मुंबईच्या महापौर रितू तावडे २४ जून रोजी झालेल्या पावसानंतर पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी सायन- किंग्जसर्कल येथे स्वत: गेल्या तेव्हा त्यांच्या पासून काही फूटांवर एक सुपरवायझर कचरा काढण्यासाठी उघडलेल्या गटारात अचानक पाय घसरुन पडल्याची घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्येष्ठ पादचाऱ्याचा मृत्यू, दोन तरुणींचा शॉक लागून झालेला मृत्यू आणि शाळकरी मुलाचा मृत्यू त्यामुळे पालिका प्रशासन आणि संबंधित यंत्रणांचा भोंगळ कारभार समोर आला आहे. या प्रकरणातून पालिका आणि इतर यंत्रणा धडा कधी घेणार असा सवाल केला जात आहे.

 

Follow Us