सरकारने शाळांना आताच सुट्ट्या… राज ठाकरे यांचं आवाहन काय?; मनसैनिकांना काय दिल्या सूचना?

राज्यात उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. प्रचंड ऊन असल्याने घराबाहेरही पडणं मुश्किल झालं आहे. अनेकांना ऊन लागण्याचे प्रकारही वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला आवाहन केलं आहे. उन्हाचे चटके बसत असल्याने विद्यार्थ्यांना शक्य तितक्या लवकर सुट्टी जाहीर करण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.

सरकारने शाळांना आताच सुट्ट्या... राज ठाकरे यांचं आवाहन काय?; मनसैनिकांना काय दिल्या सूचना?
raj thackeray
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 16, 2024 | 2:40 PM

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान प्रचंड वाढलं आहे. उन्हाचा पारा चढल्याने अनेकांना घराबाहेर पडणंही मुश्किल झालं आहे. त्यातच ग्रामीण भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी माणसांसह प्राणीमात्रांचीही ससेहोलपट सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक ट्विट करून पक्ष्यांना पाणी ठेवण्याचं आवाहन केलं आहे. तसेच उन्हाचा त्रास वाढल्याने मुलांच्या शाळांना सुट्ट्या देण्याचं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं आहे. राज ठाकरे यांनी राज्य सरकारला हे आवाहन केलं आहे.

राज ठाकरे यांचं ट्विट जसंच्या तसं

सस्नेह जय महाराष्ट्र,

गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण ह्या भागात दिवसाचं सरासरी तापमान हे जवळपास 40 अंशांपर्यंत गेलं आहे. अर्थात उर्वरित महाराष्ट्रात पण काही वेगळी स्थिती नाहीये. उष्णतेची लाट आली आहे असं जाहीर झालं आहे. मुळात अशी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच का नोंदवली नाही?, हा मुद्दा आहे. असो.

अशा परिस्थितीत लहान मुलांच्या शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु व्हायला अजून काही काळ असल्यामुळे त्यांना शाळेत जावं लागत आहे. ह्याबाबतीत, जरी आचारसंहिता असली, तरी सरकारने शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्याची तजवीज करायला हवी. तसंच उन्हाळ्याचा दीर्घकाळ शिल्लक आहे, त्यामुळे हवामानात काय बदल होऊ शकतील ह्याचे अचूक अंदाज आले तर एकूणच लोकांना त्यांच्या कामांचं नियोजन करता येईल.

 

माझी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना पण विनंती आहे की, तुम्ही पण उष्णतेच्या लाटेत स्वतःची काळजी घ्या. तसंच ह्या भीषण उन्हाळ्यात सगळ्यात जास्त हाल होतात प्राण्यांचे आणि पक्षांचे (राजकीय नव्हेत ) आणि निराधार आणि बेघर लोकांचे. त्यांना प्यायला स्वच्छ पाणी मिळेल ह्याची तजवीज करा. आणि प्राणी आणि पक्षी तर बिचारे पाणी मागू शकत नाहीत, त्यामुळे, त्यांना सहज पाणी मिळेल आणि सहज पिता येईल अशा पद्धतीने गॅल्लरीत, गच्चीत पाणी ठेवा.

आपला नम्र,

राज ठाकरे

राज्यात उष्णतेची लाट

दरम्यान, राज्यात आज उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, रायगड, ठाणे या भागातील तापमान 36 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. त्यामुळे दुपारी घराबाहेर फिरणं टाळण्याचं आवाहनही हवामान खात्याने केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us