Sanjay Raut: राज्यसभेच्या जागेबाबत कोणतंही खलबतं नाही, पण शिवसेनाच सहावी जागा लढणार; राऊतांनी संभाजी छत्रपतींचं टेन्शन वाढवलं

| Updated on: May 21, 2022 | 2:41 PM

Sanjay Raut: राज्यसभेच्या जागेबाबत कोणतीही खलबतं झाली नाही. उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय आम्हाला माहीत आहे. तो जो निर्णय जाहीर करतील तो पक्ष पुढे नेईल.

Sanjay Raut: राज्यसभेच्या जागेबाबत कोणतंही खलबतं नाही, पण शिवसेनाच सहावी जागा लढणार; राऊतांनी संभाजी छत्रपतींचं टेन्शन वाढवलं
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati) यांचं राज्यसभेवर जाणं कठिण होताना दिसत आहे. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यानी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav Thackeray) यांची भेट घेतली. तब्बल दोन ते अडीच तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर राऊत यांनी राज्यसभेच्या जागेबाबत कोणतीही खलबतं झाली नसल्याचं सांगितलं. मात्र, राज्यसभेची सहावी जागा शिवसेनाच लढवणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. राऊत यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सहाव्या जागेबाबतची शिवसेनेची भूमिका स्पष्ट करत संभाजी छत्रपतींना ही जागा सोडणार नसल्याचं सांगितलं. मात्र, संभाजी छत्रपतींना राज्यसभेवर जायचं असेल तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा या अटीचाही त्यांनी पुनरुच्चार केला. त्यामुळे संभाजी छत्रपती यांचं टेन्शन वाढलं असून राज्यसभेवर जाण्याचा त्यांचा मार्ग कठिण होताना दिसत आहे.

राज्यसभेच्या जागेबाबत कोणतीही खलबतं झाली नाही. उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय आम्हाला माहीत आहे. तो जो निर्णय जाहीर करतील तो पक्ष पुढे नेईल. खास त्याच विषयावर चर्चा झाली असे नाही. इतर विषयांवर चर्चा झाली. यावेळी खासदार विनायक राऊत उपस्थित होते. शिवसेनेचे आमदारही उपस्थित होते, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

आम्हाला आमची जागा वाढवायचीय

संभाजी छत्रपतींना राज्यसभेसाठी शिवसेनेने पाठिंबा द्यावा म्हणून मराठा संघटनांनी शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली होती. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मराठा संघटनांचं काही म्हणणं आहे. संभाजीराजेंचंही म्हणणं आहे आणि शिवसेनेचाही मुद्दा आहे. शिवसेनेचं म्हणणं आहे की सहावी जागा शिवसेनेची आहे. त्या जागेवर सेनेचा उमेदवार लढेल. छत्रपती आमचे आहेत. त्यांचं आमचं नातं आहे. शिवसेनेत या. तुमच्याबाबत शिवसेना निर्णय घेईल, अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे. जागा शिवसेनेची आहे. आम्हाला आमची जागा वाढवायची आहे. मागच्यावेळी राष्ट्रवादीने त्यांची एक जागा वाढवली होती. पुढच्यावेळी इतर कोणी त्यांची जागा वाढवेल. भावना दुखावण्याचा प्रश्नच येत नाही, असं त्यांनी सांगितलं.

खूप नावे चर्चेत असतात

शिवसेनेकडून राज्यसभेवर कुणाला पाठवण्यात येणार आहे? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर खूप नावं चर्चेत असतात. चर्चा होत असते. त्यावर उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

राहुल बोलले ते सत्यच आहे

भारतातील परिस्थिती भयावह आहे. भाजपने सर्वत्र रॉकेल ओतून ठेवलं आहे, असं विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. त्याचं राऊत यांनी समर्थन केलं. आम्हीही तीच गोष्ट दुसऱ्या शब्दात सांगितली आहे. जे सरकारविरोधी आहेत, भाजपविरोधी आहेत त्यांच्या विरोधात सेंट्रल एजन्सी मोहीम चालवत आहे. ते योग्य नाही. लोक घाबरले आहेत. मोकळेपणाने बोलत नाहीत. देशात लोकशाही आहे. पण तिचा गळा सेंट्रल एजन्सी घोटत आहे. जे तुमच्याविरोधात बोलतात त्यांच्यामागे सेंट्रल एजन्सी लावली जाते. राहुल बोलले ते सत्यच, असं राऊत म्हणाले.