हे येडxx मला का पत्र लिहितंय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल… संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांना पत्रातून डिवचले

शिवसेना फुटली. शिवसेनेची वाट लागली, याला स्वत:ला जबाबदार धरू नका. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही शिवसेनेच्या ऱ्हासाला तितकेच जबाबदार असल्याचा चिमटाही देशपांडे यांनी या पत्रातून काढला आहे.

हे येडxx मला का पत्र लिहितंय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल... संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांना पत्रातून डिवचले
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 22, 2023 | 8:25 AM

मुंबई : निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यानंतर ठाकरे गटात प्रचंड खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून ते ठाकरे गटाचे सर्वच नेते तुटून पडले आहेत. खासदार संजय राऊत यांनीही निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर सडकून टीका करतानाच आयोगासह भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. राऊत रोज शिंदे गटावर आगपाखड करताना दिसत आहेत. राऊत यांचा हा संताप पाहून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राऊत यांना पत्रातून डिवचले आहे.

संदीप देशपांडे यांनी फेसबुक आणि ट्विटरवर संजय राऊत यांच्या नावाने एक पत्र लिहिलं आहे. या पत्रातून देशपांडे यांनी राऊत यांना डिवचले आहे. राऊत यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. मेडिटेशन करण्याचाही सल्ला दिला आहे. तसेच दिवसातून दोनदा मीडियाशी संवाद साधण्याऐवजी एकदाच संवाद साधा. नंतर हळूहळू आठवड्यातून एकदा संवाद साधा, असा खोचक सल्ला संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

तसेच शिवसेना फुटली. शिवसेनेची वाट लागली, याला स्वत:ला जबाबदार धरू नका. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही शिवसेनेच्या ऱ्हासाला तितकेच जबाबदार असल्याचा चिमटाही देशपांडे यांनी या पत्रातून काढला आहे.

 

संदीप देशपांडे यांचं पत्र जसंच्या तसं

आदरणीय संजय राऊत साहेब, सस्नेह जय महाराष्ट्र !

हे येडxx मला का पत्र लिहितंय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. विश्वास ठेवा वा ठेवू नका पण तुमच्याबद्दल वाटणाऱ्या काळजी पोटीच हे पत्र लिहीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भाषेचा स्तर खालावला आहे. आपली चिडचिड होताना दिसत आहे. आपण बिनबुडाचे आरोप करीत आहात. आपल्या मनाविरुद्ध घटना घडू लागल्या की माणसाचा संयम ढाळू लागतो. त्याची चिडचिड व्हायला लागते. कधी कधी तर नैराश्याचे झटकेही येऊ लागतात. माणूस attention seeking होतो. तुम्ही कितीही नाकारलंत तरी ही सगळी लक्षणे तुमच्यात दिसायला लागली आहेत. हे सगळं हाताबाहेर जाण्याआधीच काळजी घ्यायला हवी.

माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आपण रोजच्या रोज ज्या पत्रकार परिषद घेता त्या ऐवजी दोन दिवसातून एकदा घ्या. मग हळूहळू आठवड्यातून एकदा घ्या, असं करता येईल का ते जरूर पाहा आणि ते जर शक्य नसेल तर पत्रकार परिषेदच्या अगोदर किमान दहा ते पंधरा मिनिटे मेडिटेशन करा. त्यामुळे तुम्हाला थोडं बरं वाटेल.

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपणच सगळ्यांना आदरणीय पवार साहेबांच्या नादी लावलं आहे आणि त्यामुळेच शिवसेना हातून गेली ही सल (guilty feeling ) मनाला लावून घेतली आहे. ती पहिली आपल्या मनातून काढून टाका. तुम्ही काही एकटेच या ऱ्हासाला जबाबदार नाहीत. उद्धव साहेब आणि आदित्य साहेब सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत हे लक्षात घ्या. नाहीतर काही दिवसांनी रस्त्यावर पवार…पवार….असं ओरडत दगड भिरकवत फिरायची पाळी आपल्यावर येईल.

कधी काळी तुमचा आणि माझा पक्ष भिन्न असला तरी आपल्यात व्यक्तिगत संवाद होता. ममत्व होते. त्याच काळजीपोटी हा पत्रप्रपंच ! पटलं तर घ्या…नाही पटलं तर चू xx आहे असं म्हणून विसरून जा !

आपला नम्र,
संदीप देशपांडे