Sanjay Raut: शरद पवारांचं नाव मागे, राज्यसभेसाठी ठाकरे सेनेची मोर्चे बांधणी? विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंचा मार्ग खडतर? संजय राऊतांनी थेट गणितच मांडले

Sanjay Raut on Uddhav Thackeray: राज्यसभेच्या 7 जागांपैकी एका जागेवर महाविकास आघाडीचा एका उमेदवार निवडून जाऊ शकतो. शरद पवार यांचे नाव राज्यसभेसाठी पुढे येत आहे. तर त्याचवेळी विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा होत आहे. याविषयी संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत गणित मांडले.

Sanjay Raut: शरद पवारांचं नाव मागे, राज्यसभेसाठी ठाकरे सेनेची मोर्चे बांधणी? विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंचा मार्ग खडतर? संजय राऊतांनी थेट गणितच मांडले
संजय राऊत
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 20, 2026 | 10:57 AM

Sanjay Raut on Sharad Pawar : राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडून कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याची चर्चा सुरू आहे. राज्यसभेसाठी महाराष्ट्राच्या वाट्याला 7 जागा येत आहेत. त्यातील एक जागा महाविकास आघाडीकडे असेल. या एका जागेवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून कुणाला पाठवायचं याविषयीची चर्चा सुरू आहे. शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची चर्चा सुरू असली तरी संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत काही मोठे दावे केले. विधान परिषदेवर उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात कोणतीही अडचण नसल्याचे सांगत राऊत यांनी थेट गणितच मांडले.

राज्यसभेवर शिवसेनेचा खासदार?

आदित्य ठाकरे यांनी रोटेशनचा मुद्दा पुढे करत यावेळी राज्यसभेवर शिवसेनेचा खासदार असेल असे विधान केले. तर त्यासाठी शिवसेनेकडे संख्याबळ असल्याचाही दावा केला. त्यामुळे राज्यसभेसाठी शरद पवार यांचे नाव मागे पडून उद्धव सेनेकडून नाव समोर येणार का याची चर्चा सुरू झाली. त्यावर संजय राऊतांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की आधी निर्णय तर होऊ द्या. महाविकास आघाडीची राज्यसभेसाठी एकच जागा आहे. तेवढे संख्याबळ आमच्याकडे आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी, अस्मितेसाठी नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व कोणतं आहे हे तीन पक्ष बसून ठरवतील. अर्थात निर्णय एकमतानंच होणार आहे, आदित्य ठाकरे जे बोलले ते योग्य आहे असे संजय राऊत म्हणाले. शरद पवार या देशाचे मोठे नेते आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते राज्यसभेतून निवृ्त्त होत आहेत. शरद पवार आणि त्यांचा पक्ष काय भूमिका घेतो यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. तीन पक्षांनाच मिळून निर्णय घ्यावा लागणार आहे, त्यामुळे त्याच्यावर आता बोलणे निरर्थक असल्याचे राऊत म्हणाले.

विधान परिषदेवर उद्धव ठाकरे

आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहोत, त्यामुळे आम्हाला प्रतिनिधीत्व मिळावं असं वाटणं हे सहाजिक आहे. तीन पक्ष एकत्र बसून एकमताने निर्णय घेऊ. महाराष्ट्र हिताचा निर्णय घेऊ. काँग्रेसचा निर्णय हा दिल्लीतून होतो. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचा निर्णय मुंबईत होतो, असे राऊत म्हणाले. तर राज्यसभेसाठी कोण कुर्बानी देणार त्याला विधान परिषदची जागा मिळणार, काँग्रेसची विधान परिषदेसाठी आमदार पाठवण्याची इच्छा आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे विधान परिषदेवर जाणं थोडं कठीण आहे या चर्चांवर त्यांनी मत मांडले.

उद्धव ठाकरे यांचं विधान परिषदेवर जाणं अजिबात कठीण नाही. राज्याचे माजी मुख्यमंत्री ते आहेत, शिवसेनेचे पक्ष प्रमुख आहेत. त्यांच्यामुळे विधान परिषद आणि राज्यसभेबाबत एकत्र निर्णय घेतला जाईल. शिवसेनेचे संख्याबळ सर्वाधिक 20 इतकं आहे. त्यानंतर काँग्रेस 16 आणि शरद पवार यांच्या पक्षाकडं 10 आणि इतर घटक पक्ष मिळून आमचे संख्याबळ 50 च्या घरात जात आहे. जिंकण्यासाठी 37 मतं हवी आहेत. म्हणजे आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे. विधान परिषदेवर उद्धव ठाकरे यांनी जावं अशी आमची सर्वांचीच इच्छा आहे. त्यासंदर्भात लवकरच पुढील निर्णय घेतला जाईल असे राऊत म्हणाले.