‘माझ्या अटकेचे आदेश दिल्लीतून आले’, संजय राऊतांचा मोठा दावा

"आता खोक्यांची बदनामी करत आहेत. महाराष्ट्रातील बोके खोक्यावर बसलेली आहेत. आता फक्त ओक्के शिवसेनाच", असा घणाघात संजय राऊतांनी केला.

माझ्या अटकेचे आदेश दिल्लीतून आले, संजय राऊतांचा मोठा दावा
Chetan Patil | Updated on: Nov 09, 2022 | 11:39 PM

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत आपल्या भांडूप येथील घरी दाखल झाल्यानंतर त्यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. यावेळी एक मंच उभारण्यात आला होता. तिथे राऊतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राऊतांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना तुफान फटकेबाजी केली. विशेष म्हणजे आपल्याला अटक करण्याचे आदेश दिल्लीतून आले होते, असा धक्कादायक दावा त्यांनी यावेळी केला.

“माझ्या अटकेचा आदेश दिल्लीतून आले. उसको अंदर डालो तो हमारी सरकार आएँगी ! हे मला माहिती होतं”, असं संजय राऊत म्हणाले.

“आता खोक्यांची बदनामी करत आहेत. महाराष्ट्रातील बोके खोक्यावर बसलेली आहेत. आता फक्त ओक्के शिवसेनाच. ती सुद्धा उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंची. गद्दारांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही”, अशा शब्दांत संजय राऊत कडाडले.

“मुंबई महापालिका, मुंबई आपल्या हातातून काढण्यासाठी शिवसेना फोडलीय हे लक्षात घ्या. पण ते होणार नाही”, असं राऊत म्हणाले.

“मी आज आर्थर रोड जेलमधून सुटल्यापासून जे वातावरण पाहतोय की माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकासाठी संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रात ऊर्जा निर्माण झालीय. ही खरी शिवसेना आहे. हा खरा आपला परिवार आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

“माझी सेक्युरिटी काढली. काढाना. मी तुम्हाला घाबरतो का?”, असा सवाल त्यांनी केला.

“मला पुन्हा अटक करण्याचा प्रयत्न, शिवसेनेच्या प्रत्येक नेत्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय. किशोरी पेडणेकरांना त्रास देत आहेत. काल भास्कर जाधवांवर गुन्हा दाखल केला. सुषमा अंधारे यांच्यावर काहीतरी चालू आहे. करु द्या”, असं ते यावेळी म्हणाले.

“ज्याने शिवसेना फोडली, तोडली, आमचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं, शिवसेनेचा नाव गोठवण्याचा प्रयत्न चालू आहे त्या सर्वांच्या छातडावर बसून शिवसेनेचं तेच तेज आणि वैभव, ताकद आकाशाला गवसणी घालणारी असेल. माझ्या अटकेने सुरुवात झालीय. आता सुटलोय. सुसाट सुटायचं आहे”, असं ते कार्यकर्त्यांना म्हणाले.

“आता रडायचं नाही, आता लढाई सुरु झालीय. आता संपायचं नाही. 103 दिवस तुरुंगात राहीलो. 103 आमदार निवडून येणार. प्रत्येक संकट ही संधी आहे. मी शंभर दिवस तुरुंगात राहीलो. मला माहिती होतं की प्रत्येक कार्यकर्ते माझी वाट पाहत आहेत. हे प्रेम फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेलाच मिळू शकतं”, असं संजय राऊत म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us