कुंभमेळ्यात भाविकांची रोड अ‍ॅरेस्ट, राष्ट्रपतींच्या स्नानामुळे 12 तास महाकुंभमेळा रोखून धरला…संजय राऊत यांचा आरोप

प्रयागराजमध्ये भाविकांची लूट सुरु आहे. १५-१५ तास लोक रस्त्यावर उभे आहेत. रेल्वे आणि विमानात प्रवाशांना जागा मिळत नाही. तिकिटांचे दर प्रचंड वाढले आहे. जगभरातून हिंदूंना आमंत्रण दिले आहे. सोमवारी राष्ट्रपतींचे स्नान होते. त्यामुळे १२ तास कुंभमेळ्यातील स्नान रोखले होते.

कुंभमेळ्यात भाविकांची रोड अ‍ॅरेस्ट, राष्ट्रपतींच्या स्नानामुळे 12 तास महाकुंभमेळा रोखून धरला...संजय राऊत यांचा आरोप
संजय राऊत
| Updated on: Feb 11, 2025 | 10:08 AM

प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरु आहे. या महाकुंभात स्नान करण्यासाठी जगभरातून भाविक आले आहेत. कोट्यवधी लोकांना रोड अ‍ॅरेस्ट करण्यासारखा प्रकार घडला आहे. त्यांना एक इंच पुढे जावू दिले नाही. सोमवारी राष्ट्रपतींच्या स्नानामुळे 12 तास महाकुंभमेळा रोखून धरला होता. त्रिवेणी संगमावर कोणाला जावू दिले नाही. तीन ते चार कोटी लोक तेथे होते. भाजपने कुंभमेळ्यात केलेल्या व्हीआयपी कल्चरचा फटका भाविकांना बसत आहे. दुसरीकडे विमान कंपन्या लूट करत आहेत. रेल्वेत जागा नाही. रिक्षावाले लूट करत आहे. हा काय कुंभमेळा आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी मंगळवारी उपस्थित केला.

सरकार निवडताना विचार करावा

प्रयागराजमध्ये भाविकांची लूट सुरु आहे. १५-१५ तास लोक रस्त्यावर उभे आहेत. रेल्वे आणि विमानात प्रवाशांना जागा मिळत नाही. तिकिटांचे दर प्रचंड वाढले आहे. जगभरातून हिंदूंना आमंत्रण दिले आहे. सोमवारी राष्ट्रपतींचे स्नान होते. त्यामुळे १२ तास कुंभमेळ्यातील स्नान रोखले होते. राष्ट्रपतींना स्नानासाठी १२ तास लागतात का? त्याकाळात भाविकांची प्रचंड झाले. कोट्यवधी लोक रस्त्यावर होते. कुंभमेळा हा राजकीय सोहळा करुन टाकला आहे. त्यामुळे हिंदूंचे सरकार निवडणाऱ्यांनी ही परिस्थिती पाहिल्यावर विचार करायला हवा, असा सल्ला संजय राऊत यांनी मतदारांना दिला.

तानाजी सावंत यांना टोला

महाराष्ट्रात खंडणी, अपहरणाच्या घटना घडत आहेत. दुसरीकडे श्रीमंतांची मुले बँकॉकला पळून जाताय, असा टोला संजय राऊत यांनी तानाजी सावंत यांना लगावला. सोमवारी तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिकेश खासगी विमानाने बँकॉककडे निघाला होता. त्यावेळी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. त्यावर राऊत यांनी हा टोला लगावला. शिवभोजन थाळी योजना सरकार बंद करत आहे. गरीबांच्या योजना बंद करत आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांसाठीही सरकार काहीच करत नाही. सरकारकडे शेतकऱ्यांसाठी ठोस योजना नाहीत. राज्यातील सोयाबीन उत्पादक हवालदील आहे, असे राऊत यांनी म्हटले.

अण्णा हजारे यांच्यावर टीका

अण्णा हजारे यांना महात्मा करण्याचे काम अरविंद केजरीवाल, मनीष शिसोदीया यांनी केले. त्यांनी अण्णांना दिल्ली दाखवली. भ्रष्टाचाराच्या लढाई केजरीवाल यांनी सुरु केली. राज्यात आणि मोदी सरकारची भ्रष्टाचाराची अनेक प्रकरण उघड झाली आहे. परंतु अण्णांनी त्यांची कूसही बदलली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

Follow Us