संजय राऊत यांचा आधी मुख्यमंत्र्यांच्या पुत्रावर गंभीर आरोप, आता थेट देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मोठं विधान

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधलाय. देवेंद्र फडणवीस हे बेजबाबदारपणे वागत आहेत. ते गुंडाची बाजू घेत आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केलाय.

संजय राऊत यांचा आधी मुख्यमंत्र्यांच्या पुत्रावर गंभीर आरोप, आता थेट देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मोठं विधान
Chetan Patil | Updated on: Feb 21, 2023 | 9:34 PM

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस हे बेजबाबदारपणे वागत आहेत. ते गुंडाची बाजू घेत आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केलाय. संजय राऊत यांनी आज सकाळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवल्याची माहिती समोर आलेली. या पत्रात राऊतांनी मोठा दावा केलेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी गुंड राजा ठाकुरला आपल्या हल्ल्याची सुपारी दिली, असा धक्कादायक दावा राऊतांनी केला. त्यावर फडणवीसांनी राऊत सनसनाटी निर्माण करण्यासाठी असा दावा करत असल्याची प्रतिक्रिया देत खिल्ली उडवली. त्यांच्या या प्रतिक्रियेवर राऊतांनी संताप व्यक्त केला.

‘त्यांच्या बुद्धीचे माप काढायला लागलो तर गडबड होईल’

“आमची बाळासाहेब ठाकरे स्कूल आहे. रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठान स्कूल नाही. आम्हाला त्याची गरज नाही. मी राज्याचा गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आणि त्यांनी बेजबाबदारपणे उत्तर दिलं. इतके बेफिकीर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मला दिसत आहेत. त्यांची नक्की काय सटकलीय ते मला माहिती नाही. ते इतरांच्या बृद्धीचे मापं काढतात, त्यांच्या बुद्धीचे माप काढायला लागलो तर जरा गडबड होईल”, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

‘गृहमंत्रीपदाची प्रतिष्ठा न राखता ते जे बोलत आहेत’

“या महाराष्ट्रातला एक वरिष्ठ खासदार पत्र लिहितो. अशाप्रकारचं माझं हे पहिलं पत्र आहे. त्यावर त्यांनी गांभीर्य न राखता त्यांनी जे विधान केलं आहे ते राज्याला न शोभणारं आहे. ते एका गुंडाची बाजू घेत आहेत. ज्या एका प्लॉटविषयी मी त्यांना माहिती दिली त्यावर त्यांनी बोलायलं हवं किंवा मौन राखायला हवं. पण गृहमंत्रीपदाची प्रतिष्ठा न राखता ते जे बोलत आहेत ते पाहता मला असं वाटतं ते गोंधळलेले आहेत. त्या गोंधळाचा त्रास महाराष्ट्राला होतोय”, असा घणाघात त्यांनी केला.

‘अनेक लोकप्रतिनिधींवर अशाप्रकारचे हल्ला होण्याची परिस्थिती’

“गेल्या दोन महिन्यात महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधींवर अशाप्रकारचे हल्ला होण्याची परिस्थिती निर्माण झाली. आज अशोक चव्हाण यांनी आपल्यावर हल्ल्याचा प्लॅन असल्याचा दावा केला. आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाला. जितेंद्र आव्हाड यांना मारण्याची सुपारी दिली गेली आहे. हे सर्व देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना होतंय, मी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना होतंय असं म्हणत नाही”, असं संजय राऊत म्हणाले.

“देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना या महाराष्ट्रात रोज दरोडा, हत्या, बलात्कार होत आहेत. आता लोकप्रतिनिधी सुद्धा सुरक्षित नाहीत. मला त्यांच्याकडे सुरक्षा मागण्याची गरज नाही. उलट त्यांना सुरक्षा लागली तर मी देईन. आमची शिवसेना मजबूत आहे. मी एकटा आलोय. मी एकटाच फिरतो, नडतो आणि लढतो. शब्द जपून वापरा आणि गृहमंत्र्याच्या भूमिकेत शिरा. तुमचं गृहमंत्रीपद राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी नसावं”, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

Follow Us