अरे काय रे शिंदे गट? सोड रे, अरे चोरच आहेत ना? मुंबईचं महापौरपद किती कोटीला? राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय?
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. महायुतीत मुंबईचे महापौरपद शिंदे गटाला कोट्यवधी रुपयांना विकत घेतल्याचा दावा राऊतांनी केला. शिंदे गट 'सत्ता विकत घेतो' आणि 'चोरांची टोळी' आहे, असे म्हणत राऊतांनी त्यांना 'कोब्रा गँग' संबोधले.

महायुतीत मुंबईच्या महापौरपदासाठी सव्वा सव्वा वर्षाचा फॉर्म्युला झाला असून त्यानुसार आता मुंबईचं महापौरपद शिंदे गटाला मिळणार असल्याची चर्चा आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. शिंदेंना विकत घेतल्याशिवाय काहीच मिळत नाही. सत्ताही विकत घेतात. आता महापौरपद सव्वाशे कोटीला विकत घेतलं की सव्वा हजार कोटीला विकत घेतलं याची मी माहिती घेत आहे. मला माहिती मिळेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. मिंधे गटाचा इतिहास सत्ता विकत घेण्याचा आहे. सत्ता विकत घेण्यात ते बदनाम आहेत. सव्वा वर्षाचं महापौरपद विकत घेण्यासाठी सव्वाशे कोटी मोजले की सव्वा हजार कोटी मोजले याची माहिती घेतो. त्यांना फुकट काही मिळत नाही. ते सर्वच विकत घेतात. पैसे मोजावे लागतात. दिल्लीतून किती खोक्यांना महापौरपद विकत घेणार हे कळेल. भाजपमधील मराठी महाराष्ट्र प्रेमी आहेत. ते सांगतीलच, असं संजय राऊत म्हणाले.
शिंदे गट म्हणजे कोब्रा गँग
यावेळी राऊत यांना शिंदे गटाबद्दल आणखी प्रश्न विचारण्याचा पत्रकारांनी प्रयत्न केला. तेव्हा राऊत यांनी त्यांना मध्येच थांबवलं. अरे काय रे शिंदे गट, अरे सोड रे शिंदे गट. अरे चोरच आहेत ना हे. अरे ही चोरांची टोळी आहे. ही गोल्डन गँग आहे. भाजप ही गोल्डन गँग आहे. शिंदेंचा गट ही कोब्रा गँग आहे. विषारी आहे. मुंबईत एक कोब्रा गँग होती. तशीही शिंदेंची गँग आहे, असा हल्लाही राऊत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना चढवला.
आता आवाज उठवला पाहिजे
अमराठी रिक्षाचालकांना मराठी शिकण्यसाठी एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही वाढ देण्यात आल्याकडे राऊत यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावरही राऊत यांनी भाष्य केलं. निवडणुका कोणत्याही असतील. पश्चिम बंगालच्या असतील बिहार, गुजरात, कर्नाटकातील असतील. विषय मराठीचा आहे. निवडणुकांचा आणि याचा संबंध काय? म्हणजेच सरकारचा निर्णय मराठी माणसासाठी नसून हा निर्णय हिंदी भाषिकांसाठी घेतलेला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील सो कॉल्ड मराठी प्रेमी मंत्र्यांनी आवाज उठवला पाहिजे, असं राऊत म्हणाले.
फडणवीस यांना सहकारी पक्षांना सांगायचं आहे मी तुमचा बॉस आहे. मी जे करीन ते पूर्व आहे. मुख्यमंत्री हा नेता असतो सरकारचा. त्यामुळे तुम्ही दिल्लीत कितीही फुगड्या घातल्या तरी मीच बॉस आहे. माझा निर्णय अंतिम राहील. हे त्यांनी काल दाखवून दिलं. इतर काही विषयातही अशा प्रकारचे निर्णय घेतले. मग क्लस्टरचे असतील. बांधकाम व्यवसायातील असतील. कारण ते बॉस आहे. मुख्यमंत्र्यांना जेव्हा दिल्लीत जावं लागेल. तेव्हा त्यांचा जो माणूस मुख्यमंत्री म्हणून येईल त्याच्यासाठी ही व्यवस्था आहे. मुख्यमंत्री म्हणून.
नेपाळला मदत केलीच पाहिजे
नेपाळला केंद्र सरकारकडून मदत केली जात असल्याचं त्यांनी समर्थन केलं. नेपाळमध्ये जो हाहाकार माजला आहे. नुकसान झालं आहे. एकेकाळचं हिंदूराष्ट्र आहे. तिथे आमच्याही श्रद्धा आहेत. आपले लोक तिथे जातात. मंदिरांना भेटी देतात. आपले लोकही तिथे फसले आहे. तिथे प्रचंड हाहाकार उडाला आहे. भारत सरकारने सर्वांना वाचवण्यासाठी मदत केली पाहिजे. मोठ्या प्रमाणावर केली पाहिजे. हा हाहाकार उडाला तो चीनमुळे झाला आहे. चीन वाचवू शकला असता. पण नेपाळशी आपलं नातं आहे. आध्यात्मिक आहे. धार्मिक आहे आणि राजकीय आहे. आपण त्यांना मदत केली पाहिजे, असं राऊत म्हणाले.